Follow me on Twitter- https://twitter.com/doc_chinmay

Thursday, March 27, 2008

रशियात दुमदुमला 'जय शिवाजी' चा नारा



निश्चयाचा महामेरु बहुत जनांसी आधारु अखंडस्थितीचा निर्धारु श्रीमंत योगी या भुमंडळाचे ठायी धर्मरक्षी ऐसा नाही महाराष्ट्र धर्म राहीला काही तुम्हांकरीता
यशवंत,किर्तीवंत,सामर्थ्यवंत,वरदवंत,पुण्यवंत,नीतिवंत अशा जाणत्या राजा शिवछत्रपतींची ,सोमवार दिनांक २४ मार्च रोजी जयंती होती. अशा या महाराष्ट्र गौरवाच्या .. नव्हे ,नव्हे संपुर्ण भारत गौरवाच्या दिवशी आम्ही उत्सव साजरा करायचा असे ४ वर्षापुर्वीच ठरवले. आणि गेले ४ वर्ष आम्ही शिवजयंती उत्सव येथे म्हणजे सारातोव्ह,रशियात साजरा करतो. या दिवशी एक छोटासा पण माहीतीपुर्ण व मनोरंजक कार्यक्रम आम्ही गेले ४ वर्ष करत आहोत. हा कार्यक्रम फक्त शिवाजी महाराजांशीच संबंधीत असतो. दरवर्षी कार्यक्रमाचा दर्जा सुधारण्याचा आमचा प्रयत्न असतो. आणि दरवर्षी कार्यक्रमाचा दर्जा सुधारण्यात आम्हाला यश आलंय हेही मी सांगू इच्छितो.
फोटो पहाण्यास येथे क्लिक करा-http://picasaweb.google.ru/chinya1985/Shivajayanti
शिवाजी महाराजांविषयी मराठी माणसाला माहीती असतेच. पण छोटेमोठे तपशील मात्र माहीत नसतात. शिवाय येथे मराठी पुस्तके मिळण्याचे कुठलेही साधन नसल्याने कार्यक्रमासाठी लागणारी माहीती मिळवण्यासाठी दरवर्षी तारांबळ उडते. इंटरनेटवरील बहुतेक माहीती इंग्रजीत आहे व ती फक्त वरवरचीच आहे. तपशीलवार शिवचरीत्र इंटरनेटवर सापडत नाही. त्यामुळे यावर्षी आधीच इंटरनेटवर माहीती शोधण्यास सुरुवात केली. एका शिवभक्तानी 'शिवाजी- द ग्रेट' हे बालकृष्णन यांनी १९४० साली लिहिलेले अतिशय छान पुस्तक पाठवले. पण ते विश्लेशणात्मक असल्याने त्याचा उपयोग फक्त भाषणापुरता होणार होता. संपुर्ण शिवचरित्र मिळणे आवश्यक होते.त्यासाठी शोध चालुच होता. शेवटी माझ्या मोठ्या भावाने शिवचरीत्राची लिंक भारतातुन पाठवली. बाबासाहेब पुरंदरेंनी सांगितलेले शिवचरीत्र सर्वांनी आवर्जुन ऐकावे असे आहे.आता आमच्याकडे इतिहास आणि त्याचे विश्लेषण दोन्हीही होते. त्यावरुन २-३ कथाकथन, १ नाटक,१ भाषण करायचे नक्की झाले. त्यानंतर झकासराव या मायबोलीकराने किल्ल्यांची माहीती असलेले ईपुस्तक पाठवले. त्यावरुन राजगड या किल्ल्यावर फोटो शो करायचा ठरला. शिवाय ३ गाणी म्हणायचे ठरवले.गेले ३ वर्ष आम्ही शिवाजी महाराजांवर प्रसिध्द झालेली अनेक गाणी म्हटली होती पण पोवाडा एकदाही म्हटला नव्हता. यावर्षी तो म्हणायचाच असे ठरले. त्यासाठी किशोर मुंढे या दुसर्‍या मायबोलीकराने दिलेली लिंक कामास आली. आता आमच्याकडे पोवाडे होते पण ते गाण्यासाठी लागणारी वाद्य नव्हती व पोवाडे म्हणण्याचा सराव असलेला गायकही नव्हता. कारण येथील ४०-५० मराठी विद्यार्थ्यांमधे एकानेही भारतीय शास्त्रीय संगीताचे शिक्षण घेतलेले नाही.चित्रपट संगीत गाणारे आहेत. शेवटी त्यांनीच पोवाडा गाण्याचा प्रयत्न करायचे ठरवले.
शिवाजी महाराज जेंव्हा आग्र्यात गेले तेंव्हा औरंगजेब बादशहाच्या दरबारातील दृष्य व नंतर वेशांतर करुन राजगड वर जिजामातेंची भेट ही दोन दृष्य नाटकाद्वारे दाखवायची ठरली. तानाजी मालुसुरे यांचा कोंढाणा जिंकण्याचा प्रसंग व अफझल खानाचा वध या घटना मागच्याच वर्षी दाखवल्याने यावर्षी मोरारबाजी देशपांडे, बाजीप्रभु देशपांडे,शाहिस्तेखानावर हल्ला यांचे कथाकथन करण्याचे ठरले.
'मराठी पाउल पडते पुढे' , 'हे हिंदु नरसिंहा' व 'वेडात मराठे वीर'ही गाणी गायची ठरली.त्याचप्रमाणे खाडीलकर यांनी १९२० साली गायलेल्या एका पोवाड्याची ऑडीओ फाईल व शब्द मिळाले त्यामुळे एक पोवाडा म्हणने नक्की झाले. पण यापैकी एकही ऑडीओ स्टिरीओ नसल्याने आमच्या श्रीकांत शिंदे या संगीत तज्ञापुढे मोठे आव्हान होते.शेवटी मागे कमी आवाजात गाणे चालू करुन गायकाने गाणे म्हणायचे व जेंव्हा फक्त संगीत असेल तेंव्हा आवाज वाढवायचा असे ठरले. इतर पोवाडे खुप मोठे होते व ते पार्श्वसंगीताशिवाय म्हणनेही अवघड होते. शेवटी शरद मोहळकर या आमच्या मित्राने स्वत:च पोवाडा लिहिला. पण त्या पोवाड्यासाठी गायकही नव्हता व पार्श्वसंगीतही नव्हते.शाहीर बाबासाहेब देशमुख यांच्या पोवाड्यांमधुन काही लुप्स पार्श्वसंगीतासाठी वापरायचे असा प्रयत्न आमचा संगीत तज्ञ २-३ दिवस करत होता पण ते जमले नाही. आदल्या रात्रीपर्यंत पोवाडा कोणी गायचा हेही ठरले नव्हते. त्याचप्रमाणे 'वेडात मराठे वीर' हे गाणे म्हणनारी गायिकाही काही कारणामुळे गाणे म्हणु शकणार नव्हती. त्यामुळे आदल्या दिवशी सांगायच्या गोष्टी जास्त व गायच्या गोष्टी कमी होतात काय अशी भिती वाटू लागली. पण गाणी नसल्यास कार्यक्रम नाही म्हटला तरी कंटाळवाणा आणि फार उपदेशात्मक होतो. त्यामुळे शेवटी पोवाडा व 'वेडात मराठे वीर' हे समुहगानाप्रमाणे म्हणायचे ठरले.
भिंतीवर लावण्यासाठी म्हणुन अभिकेष कोचले या मित्राने शिवाजी महाराजांचे एक मोठे चित्र काढले.आदल्या रात्री होस्टेलमधे मराठीमधे निमंत्रण लावण्यात आले. नाटकाचा सराव दररोज होतच असे. आमच्या नाटकामध्ये जिजामातेच काम करणारी दिव्या शेट्टी ही मुलगी आंध्र प्रदेशची होती,तिला मराठीही बोलता येत नव्हते. हे काम करण्यास काही मराठी मुलींनी नकार दिला तर काही मराठी मुली जिजामाता म्हणुन बरोबर दिसत नव्हत्या.
आणि सोमवार २४मार्चचा दिवस उजाडला. दुपारपासुनच कार्यक्रमाची तयारी सुरु झाली.प्रसाद म्हणुन बासुंदी बनवण्याचे काम कार्यक्रमात काम न करणार्‍या ५व्या कोर्समधे माझ्याबरोबर शिकणार्‍या मित्रांनी केले. कार्यक्रमासाठी लागणारे कपडे ,इतर साहित्य जमवण्यात आले. जिथे कार्यक्रम होणार होता त्या कक्षाची सजावट केली,कॉरिडॉर मधे पताका लावल्या.
कार्यक्रमाची सुरुवात शिवपुजनाने झाली.त्यानंतर मी शिवाजी महाराजांचे महत्व थोडक्यात सांगितले. शिवाजी महाराज जगातील सिकंदर,ज्युलिअस सीझर,नेपोलियन व इतर योद्ध्यांइतकेच किंवा कदाचित थोडेसे जास्तच महान होते हे सांगण्यात आले. शिवाजी महाराजांबद्दल तत्कालीन ब्रिटीश,पोर्तुगिजांनी काढलेले गौरवोद्गार ,शिवाजी महाराजांनी सुरु केलेली रयतवारी पध्दत,शिवकालीन न्यायव्यवस्था तसेच शिवपुर्व मुस्लिम अत्याचारांबद्दल विविध संतांनी काढलेले उद्गार व रामदास स्वामींनी शिवगौरवासाठी लिहिलेले 'निश्चयाचा महामेरु' इत्यादी गोष्टी सांगण्यात आल्या. त्यानंतर विक्रांत ओव्हळ या आमच्या गायकाने अतिशय अवघड असा 'ज्याच्या कबंधानं भुतळी' हा १९२० साली गाण्यात आलेला पोवाडा अतिशय सुंदर पध्दतीने गायला. पोवाडा जवळपास ९० वर्षापुर्वीचा असल्याने रेकॉर्डींग पण अतिशय खराब होते व त्यात असलेल्या खरखर आवाजामुळे एकाही वाद्याचा आवाज नीट येत नव्हता.इंग्रजी माध्यमात शालेय शिक्षण घेतलेल्या विक्रांतने खुप कष्ट घेउन तो पोवाडा जसा होता तसा गायला. त्यानंतर अजित साठे या मित्राने मुरारबाजी देशपांडे यांवर आधारीत 'पुरंदरचा वेढा' हा प्रसंग सांगितला. मुरारबाजीने अतिशय कमी सैन्यासकट दिलेरखानास दिलेली झुंज व मुरारबाजींच्या मृत्युनंतरही वेढा चालुच ठेवणार्‍या मावळ्यांचे पराक्रम सर्वांनाच प्रेरणादायी ठरतात. त्यानंतर 'मराठी पाउल पडते पुढे' हे गाणे निलेष कसबेकर व सहगायकांनी अतिशय छान रित्या म्हटले. टाळ्यांचा कडकडाट झाला.'हर हर महादेव, जय भवानी,जय शिवाजी' च्या नार्‍यांनी सभाकक्ष दुमदुमुन गेले. या गाण्याच्या तयारीला अतिशय कमी वेळ मिळाला होता. त्यानंतर विजय फुले याने पावन खिंडीत बाजीप्रभु देशपांडेंनी दिलेली लढत खुलवुन सांगितली. शिवाजी महाराजांचे आपल्या सैनिकांवर असलेले प्रेम व त्यांच्या सैनिकांनी मृत्यु समोर दिसत असतानाही मरेपर्यंत शिवरायांसाठी दिलेला लढा खुपकाही सांगुन जातो.आजच्या स्वार्थी जगात आपल्या प्रजेवर एव्हढ प्रेम करणारा नेता व त्याच्यासाठी स्वतःचा जीव काहीही विचार न करता देणारी प्रजा दोन्हीही मिळण मुश्किल. त्यानंतर आनंद रासने याने राजगड वर आधारीत फोटो शो सादर केला त्यात राजगडचा थोडक्यात इतिहास व तेथे सध्या असलेली प्रेक्षणीय स्थळे याबद्दल फोटोंच्या आधारे माहीती सांगितली. मग रुचिका या १ल्या वर्षाला शिक्षण घेणार्‍या मुलीने 'हे हिंदु नरसिंहा' हे लता मंगेशकरांनी गायलेले अतिशय अवघड गाणे म्हटले. तिची तब्येत बरी नसतानाही तिने सुरेल गाणे म्हटले. यानंतर शरद मोहोळकर याने सहगायकांबरोबर स्वत: लिहिलेला पोवाडा कुठल्याही वाद्याशिवाय सादर केला. आमच्या कार्यक्रमातील हा सर्वात छान भाग होता. प्रेक्षकांनी पोवाडा चालु असतानाच तालात टाळ्या वाजवायला सुरुवात केली. जो पोवाडा कार्यक्रमाच्या ३-४ तास आधीपर्यंत होईल का नाही अशी शंका होती तो पोवाडा कार्यक्रमानंतर सर्वांच्याच लक्षात राहीला. त्यानंतर आमचे नाटक सुरु झाले. नाटकात आनंद सराफ याने शिवाजी महाराजांची भुमिका केली त्याचबरोबर जाधव राजे श्रीकांत,रोहीत व्यवहारे,चिन्मय घोडके व इतर कलाकारांनी काम केले. आग्र्याला औरंगजेब बादशहाच्या दरबारात जेंव्हा शिवाजी महाराजांच्या स्वाभिमानावर, सार्वभौमत्वावर जेंव्हा आघात झाला त्यानंतर ज्या दरबारात मान खाली घालुन उभे रहावे लागत असे,हळुच बोलावे लागत असे अशा दरबारात शिवाजी महाराज कडाडले व आपला अपमान झाला म्हणुन निघुन गेले यावरुन शिवाराय किती साहसी होते हे दिसुन येते. आपल्या राज्यातुन फक्त १००० सैनिकांनीशी आलेला राजा मुघलांच्या दरबारात कडाडतो आणि बादशहाच्या परवानगीशिवाय निघुन जातो यावरुनच त्याच्या शौर्‍याची कल्पना येते. मला नाही वाटत की औरंगजेब बादशाच्या दरबारात असे करण्याची दुसर्‍या कोणी हिम्मत केली असेल. त्यानंतर त्याच आग्र्यातुन सुटुन निघणेही तितकेच अद्भुत!!!डगलसनी म्हटलय की बुध्दिमत्ता व मुस्तद्देगिरी यात शिवाजी महाराजांच्या करंगळीत जितक होतं तेव्हढ औरंगजेबाच्या पुर्ण शरिरात नव्हत हे अगदी खर आहे. नाटकानंतर 'वेडात मराठे वीर' हे गाणे कार्यक्रमात भाग घेतलेल्या सर्व कलाकारांनी मिळुन म्हटले. प्रतापराव गुजरांच्या साहसाचे या गाण्यात अतिशय नेमके वर्णन केलेले आहे. यानंतर आभार प्रदर्शन झाले ज्यात सर्व कलाकारांना शिवरायांचे स्मरण म्हणुन एक एक प्रकाशचित्र देण्यात आले,प्रसादवाटपानंतर कार्यक्रम संपला.
अनेकदा अमराठी,रशियन विचारतात की तुम्ही हा सण का साजरा करता? आम्ही त्यांना सांगायचा प्रयत्न करतो की शिवाजी महाराज किती महान होते. पण या महान राज्याबद्दल अमराठी लोकांना सोडाच पण मराठी माणसालाही पुरेशी माहीती आहे का हा प्रश्नच आहे. काही शिवभक्तांनी केलेल्या पाहणीदरम्यान महाराष्ट्रातील फक्त १६% लोकांना शिवरायांबद्दल पुरेशी माहीती आहे. जर अशा महापुरुषांबद्दल आपल्याला माहीती नसेल तर स्वाभिमानी,देशाभिमानी,परोपकारी,साहसी,सुसंस्कृत,निस्वार्थी,अन्यायाविरुध्द लढणारा समाज बनण शक्य आहे का याचा विचार होणे आवश्यक आहे. स्वार्थासाठी फसवा, खोटेपणा करा,चोरा, ओरबाडा पण ते करताना सापडू नका अशी तर मुल्य बनत नाही आहेत ना???का मुल्य,संस्कृती बद्दल बोलणे म्हणजे पुराणमतवादी अशी व्याख्या होत आहे???शेतकर्‍यांच्या शेतांपासुन आपल्या सैनिकांना दुरुन जायला सांगणारे कारण घोड्यांच्या टापांनी शेत उध्वस्त झाले तर शेतकरी उध्वस्त होईल म्हणुन काळजी घेणार्‍या शिवारायांच्या महाराष्ट्रात शेतकरी आत्महत्या करतात व नेते काहीही करत नाहीत हे बघुन चिड येते. शिवकालीन न्यायव्यवस्थेपासुन आजची न्यायव्यवस्था पुढे आहे का मागे???आपले राजकीय नेते एकमेकांना शह देण्यास जी बुध्दिमत्ता आणि कुटनीती वापरतात ती ते देशाच्या निरनिराळ्या समस्या सोडविण्यास एकत्र येउन का वापरत नाहीत्???आम्ही आमच्या कार्यक्रमात दरवर्षी सांगतो की शिवाजी महाराज खुपच महान होते,आम्हाला शिवाजी महाराज बनवायचा नाहीये पण आमच्या कार्यक्रमातुन प्रेरणा घेउन एकजरी मावळा बनला तरी आम्ही आमचा प्रयत्न सफल मानु. पण मावळा बनण्यासाठी लागणारी इच्छाशक्ती आपल्यात आहे का???
चिन्मय नंदकुमार कुलकर्णी.

गणपती आले रशियाला!!!!!


समाधिसंस्थं हृदि योगिनां यं प्रकाशरुपेण विभातमेतम सदा निरालम्बसमाधिगम्यं तमेकदन्तं शरणं व्रजाम: -समाधिस्थ योग्यांच्या हृदयात तुच प्रकाश म्हणुन विराजतोस आणि विलंबाशिवाय समाधित तुझी अनुभुती होउ शकते अशा एकदंत गणेशा तुला मी शरण येतो.
इथे फोटो पहा- http://picasaweb.google.com/chinya1985
आमच्या होस्टेलमधे आम्ही गेली चार वर्ष गणेशोत्सव साजरा करत आहोत. रशियामधील सारातोव्ह नावाच्या शहरात मी पाचव्या वर्षात मेडिकलचे शिक्षण घेत आहे. चार वर्षापुर्वी आम्ही ३-४ जणांनी गणपती बसवला होता. मराठी मुलेही तेंव्हा बोटावर मोजण्याइतकी होती. पण या वर्षी मात्र गणेशोत्सव मोठा करायचाच असे खुप आधीच ठरवले होते. उत्सवाच्या तयारीला सुरुवात सुट्टित भारतात जाण्यापुर्वी म्हणजेच जुनच्या शेवटच्या आठवड्यात झाली होती. भारतातुन काय काय कोणी कोणी आणायचे हे तेंव्हाच ठरवले . दररोज आरती ,प्रसाद ,गणपती अथर्वशीर्षाचे पठण आणि एक छोटा सांस्कृतिक कार्यक्रम ठेवायचा असे ठरले. इथे भारतीय फार नसल्याने भारतीय वस्तू मिळणारी दुकानेही नाहित त्यामुळे गणेशोत्सवाची जवळपास सर्व खरेदी भारतातुन करावी लागली. आमच्या इथे दक्षिण भारतिय जास्त आणि त्यांचा ओढा जास्त करुन ख्रिश्चन धर्माकडे आहे त्यामुळे त्यांना व इतरांना बोलावण्यासाठी निमंत्रण पत्रिका छापुन आणायचे ठरले. भारतात गेल्यावर सर्वात आधी निमंत्रण पत्रिका छापल्या त्यानंतर सजावटीच्या आणि प्रसादाच्या सामानाची खरेदी केली आणि प्रवासात काय होईल सांगता येत नाही म्हणुन भारतातुन २ मुर्ती आम्ही घेउन आलो.
इथे आल्यावर ८-१० जणांनी मिळुन गणपती होस्टेलमधील सभागृहात बसवायचा की एखाद्याच्या खोलीमधे बसवायचा यावर चर्चा झाली .शेवटी रशियन माणसे सभागृहात आपले नियम पाळणार नाहित म्हणुन मोठ्या खोलीत गणपती बसवायचा ठरले. भारतातुन येताना थर्माकॉल आणने शक्य नव्हते त्यामुळे उत्सवाच्या ४-५ दिवस आधी त्याचा शोध घेणे चालु झाले. इथल्या लोकांना थर्माकॉल सजावटीसाठि वापरता येतो हे माहितच नव्हते त्यामुळे तर आणखीनच पंचायत! जिथे थर्माकॉल दिसले ते इतके जाड होते की त्यातुन कुठलीच सजावट शक्य नव्हती. शेवटी टाइल्स , वॉलपेपर्स मिळणार्‍या दुकानात पातळ थर्माकॉल मिळाले मात्र ते फारच पातळ असल्याने त्यांचा वापरही मर्यादीत करता येणार होता. तिच वेळ चमकी शोधताना आली. जिथे जिथे चमकी सापडे ती कॉस्मेटिक म्हणुन वापरता येणारी किंवा डींकात मिसळलेली होती. शेवटी त्यालाही पर्याय मिळाला. गणरायाला 'विघ्नकर्ता आणि विघ्नहर्ता' म्हणतात . म्हणजे आधी तोच विघ्न आणतो आणि मग भक्तांच्या प्रार्थनेला साद देउन तोच ती विघ्ने दूर करतो याची आम्हाला प्रचिती आली.
पुर्ण होस्टेल १० दिवस गणेशमय झाले पाहिजे असे आम्हाला वाटत होते. खास भारतिल 'लुक' यावा म्हणुन आम्ही भारतातुनच १००० च्या आसपास पताका घेउन आलो होतो. त्या पताका दोर्‍याला चिकटवायचे काम मात्र इथे करायचे होते. ते केल्यानंतर पाठदुखी हा प्रकार काय असतो हे कळले. खळ वगैरे नसल्याने 'फेविस्टिक्'ने हे काम करावे लागले. त्यानंतर पुर्ण रुम सजावी म्हणुन भारतातुन आणलेल्या पोस्टर्सवर सजावटिचे काम केले. प्रत्येक पोस्टरला ड्रॉइंगपेपरवरती रंगीत क्रेपपेपर लावून त्यावर महिरप करण्यात आला. त्यानंतर गणपती कमळात बसवायचा म्हणुन थर्माकॉलच्या सहाय्याने कमळ बनवले. १३ तारिख आली पण गणपतीचे कोलाज आणि ओंकारस्वरुप गणपती बनवण्याचे कामही सुरु झाले नव्हते. कोलाजसाठी लागणारे फोटो तर इंटरनेटवरुन मिळाले होते मात्र आमच्यापैकी कुणाकडेही प्रिंटर नसल्याने त्यालाही सुरुवात झालेली नव्हती. मोठा ओंकारस्वरुप गणपती (म्हणजे ६-७ थर्माकॉल शीट्स) बनवण्यास आधी तो मोठ्या ५-६ ड्रॉइंगपेपरवर काढण्यात आला ,मग थर्माकॉलवर ट्रेस करुन ,तिथे काढून तो कापण्यात आला व नंतर रंगवण्यात आला. त्यासाठी २ दिवस एक मित्र ८-८ तास गुडघ्यावर बसुन काम करत होता. कोलाज बनवताना अजुन एक विघ्न आले-प्रिंटरची व्यवस्था झाली पण तो रंगित नव्हता . अजुन एक विघ्न म्हणजे गणेशोत्सवाच्या ३ दिवस आधी मी आजारी पडलो पण त्यावेळी काम इतके राहिले होते की झोपायलाही पुरेसा वेळ मिळत नसे शिवाय दिवसा कॉलेजला जाणे अत्यावश्यक होते. पण गणरायाच्या कृपेने दरवेळी ७-८ दिवस राहणारे दुखणे २-३ दिवसातच संपले.
जास्तित जास्त लोकांना येता यावे म्हणुन पुर्ण रुम रीकामी करण्यात आली . १४-१५ तारखेला तर श्वास घेण्यासही वेळ नव्हता .सर्व सजावट या दिवशी करण्यात आली तसेच होस्टेलच्या पुर्ण कॉरीडॉरला पताका लावण्यात आल्या. सर्व विद्यार्थ्यांना निमंत्रण पत्रिका वाटण्यात आल्या. १५ तारखेला प्रसादासाठी १३० च्या आसपास मोदक व शिरा करण्यात आला. पहिल्या दिवशी जवळजवळ १०० लोकांनी दर्शन घेतले. गर्दी होईल हे माहित होते मात्र इतका प्रतिसाद मिळेल असे वाटले नव्हते. आमचे कॉलेज सकाळीच असल्याने पहाटेच उठुन स्नान करुन पुजा करावी लागत असे. गणेशोत्सवाच्या तयारीमुळे रात्री २-३ वाजता झोपुन परत ३-४ तासांनी उठावे लागत असे. दिवसभर कॉलेज असल्याने दिवसा झोपणे शक्य नव्हते. परत आल्यावर पुजेची तयारी ,प्रसाद बनवणे यामुळे क्षणभर उसंत मिळत नसे. गणेशोत्सवाच्या आधी सजावटीत वेळ गेल्याने सांस्कृतिक कार्यक्रमांची तयारीही सुरु झाली नव्हती. त्यामुळे त्या तयारीसाठी वेळ द्यावा लागत होता.
१६ तारखेला बेसनाचे लाडु हा प्रसाद होता . जवळजवळ ५० मुळे पुजेसाठी आले होते. ३ आरत्या , घालिन लोटांगण, मंत्रपुष्पांजली यात सर्वजण रममाण होत. त्यानंतर गणपतीबाप्पा मोरया च्या गजरात सर्व जण उत्साहात येत. त्यानंतर गणपती अथर्वशीर्ष पठण होत असे. त्या दिवशी हरे कृष्ण म्हणजेच इस्कॉनच्या भक्तांनी येउन किर्तन केले. अनेक जण भारतिय असुनही किर्तनाला प्रथमच आले होते. जवळपास १ तास चाललेल्या किर्तनात सर्वजण इतके रममाण झाले की झाले वेळेचेही भान राहिले नाही. सर्व रुम जणुकाही वैकुंठात परिवर्तित झाली होती. बर्‍याच भारतियांना असा अनुभव प्रथमच आला होता. भगवानांच्या नामातली गोडी अनेकांना जन्मानुजन्माच्या प्रतिक्षेनंतर अनुभवण्यास मिळाली.
१७ तारखेला नारळाच्या वड्या हा प्रसाद आणि गणपती अथर्वशीर्षाचा अर्थ असा सांस्कृतिक कार्यक्रम होता. त्यानंतर २ दिवस अष्टविनायक दर्शन आणि हलवा,खीर असा प्रसाद होता. ६व्या दिवशी गाण्यांचा कार्यक्रम होता. मोठ्या उत्साहात 'अष्टविनायका तुझा महिमा','प्रथम तुला वंदितो',आणि हिंदी 'मोरया' ही गाणी विद्यार्थ्यांनी म्हटली. प्रसादासाठी बासुंदी होती. त्यानंतरच्या २ दिवशी प्रजापती ब्रह्मकुमारीच्या येथील प्रतिनिधींनी ध्यानाचा कार्यक्रम घेतला,एका रशियनने भारतिय शास्त्रिय संगीताचा कार्यक्रम घेतला.खिरापत व राजगीर्‍याचा शीरा असा प्रसाद दाखवण्यात आला. ९व्या विद्यार्थ्यांच्या मागणीनुसार पुन्हा इस्कॉनच्या भक्तांनी किर्तन घेतले. जवळजवळ २ तासांच्या किर्तनाला पहिल्यापेक्षाही चांगला प्रतिसाद मिळाला. त्या भक्तांनीही सर्वांसाठी प्रसाद बनवुन आणला होता. आम्ही भोपळ्याचा शीरा हा प्रसाद केला होता.
१०व्या दिवशी विद्यालयाची डीन ,इतर शिक्षक,तसेच येथील टी.व्ही.चे पत्रकार येणार असल्याने खास कार्यक्रम ठेवण्यात आला. प्रसादासाठी गुलाबजाम्,नारळाचे लाडु तसेच दक्षिण भारतिय पध्दतीचा चण्याचा प्रसाद बनवण्यात आला. सांस्कृतीक कार्यक्रमात गणेश व गणेशोत्सवाची माहिती, 'तु वेडा कुंभार्','चिक मोत्याची माळ' ,'मोरया' या गीतांचे गायन तसेच 'राधा कैसे ना जले ' वर नृत्य तर गणेशजन्मावर एक छोटस नाटक बसवण्यात आल होत. पुर्ण गणेशोत्सवादरम्यान अनेक रशियन पाहुण्यांनी भेट दिली आणि आम्ही केलेल्या सजावटीला दाद दिली. अनेकांचा विश्वासच बसत नव्हता की रशियात अशा प्रकारचा सोहळा आणि सजावट होऊ शकते. गणपती असा का हा तर प्रत्येकाचा आवडता प्रश्न होता. मला नाही वाटत की आम्ही दिलेला प्रसाद कोणी रशियन विसरु शकेल.
विसर्जनाच्या दिवशी संपुर्ण होस्टेलला प्रत्येक रुममधे जाउन प्रसाद देण्याचे ठरले होते. ३००हुन जास्त मोदक,शीरा आणि मसाला दुध बनवण्यात आले होते. पुजा झाल्यावर आणि अथर्वशीर्षाची २१ आवर्तने झाल्यावर नाचत ,गात आणि 'गणपती बाप्पा मोरया,पुढच्या वर्षी लवकर या'च्या नार्‍यांनी सर्व होस्टेलचा परिसर दुमदुमुन गेला. संध्याकाळी ७ नंतर व्होल्गा नदीवर ५० च्या आसपास भारतिय पोषाख घातलेल्या विद्यार्थ्यांनी गणपती विसर्जन केले नंतर पुर्ण होस्टेलला प्रसाद देण्यात आला.
हा सर्व सोहळा आम्ही ठरवलेल्या सोहळ्यापेक्षा कितीतरी पटीनी चांगला झाला होता. बहुतेक पहिल्यांदाच आमच्या होस्टेलमधील मराठी माणसे एकत्र आली होती. अनेक अडचणी येऊनही उत्सव व्यवस्थित पार पडला. हा सर्व उत्सव यशस्वी बनवण्यात अनेक कार्यकर्त्यांनी हातभार लावला, आळस न करता पडेल ते काम वाटेल त्या वेळी पुर्ण केले. विसर्जनानंतर सर्वजणांनी एकत्र येउन भोजन केले.सर्व जण आनंदी आणि समाधानी होते.
आत्तापर्यंत अनेक वर्षे गणेशोत्सव साजरा केला पण हा गणेशोत्सव संपुर्ण आयुष्यात विसरणे शक्य होणार नाही. कुठलेही काम करताना होणारा आनंद त्याच्या पुर्तीनंतर होणार्‍या आनंदापेक्षा कितीतरी मोठा असतो असे ऐकले होते, वाचले होते पण यावेळी त्याची प्रतिची आली. पण कुठल्याही गोष्टीचा शेवट गोड झाला की दुग्धशर्करा योग होतो. आमच्यासाठी हा तसाच योग होता.१५ दिवस पुर्ण भारावुन जाउन काम चालू होते. फक्त एकच विचार मनात येत असे तो म्हणजे गणपती!!परवा विसर्जन झाले आहे पण काल आणि आजचा दिवस संपता संपत नाही आहे. काहीतरी महत्त्वाचे जणुकाही हरवले आहे. मन भरुन येते,कंठ दाटून येतो. ज्या रुममधे गणपती होता ती रुम पुर्वीसारखी केली आहे.आता तिथे पाय ठेववत नाही. पहाटेच जाग येते ,जातायेता पाय त्या रुमकडे वळतात. काल रात्रीच होस्टेलमधल्या पताका काढल्या. पुर्ण कॉरिडॉर भकास दिसत आहे. असे क्षण मोजकेच असतात हवे तेंव्हा ते येत नाहित आणि गेल्यानंतर आठवणीने नकळत डोळ्यात पाणी आणतात. बहुतेक यालाच जीवन म्हणतात.
-चिन्मय कुलकर्णी