Follow me on Twitter- https://twitter.com/doc_chinmay

Tuesday, November 4, 2008

जात्युच्छेदन आणि हिंदुत्व: सावरकर, संघ आणि शिवसेना.

खालील लेख हितगुज ऑनलाईन दिवाळी अंक २००८ मधे प्रसिध्द झालेला आहे.
-------------------------------------------------------------------------------------------------
तुम्ही आम्ही सकल हिंदू बंधुबंधू
तो महादेवजी पिता आपुला चला तया वंदू
उभयांनी दोष उभयांचे खोडावे
द्वेषासी दुष्ट रुढींसी सोडावें
सख्यासी आईच्यासाठी जोडावें
स्वातंत्र्यवीर सावरकर

वरील ओळींमधून सावरकर 'समस्त हिंदू एकमेकांचे बंधू आहेत' हे सांगतात पण हिंदू समाजास लागलेला सर्वात मोठा शाप म्हणजे 'जात' आहे. जर समस्त हिंदू बंधूंची एकजूट करायची असेल तर ही 'जात' संपवणे आवश्यक आहे. आणि हिंदूंची एकजूट करणे हेच हिंदुत्वाचे लक्ष्य आहे. मग हिंदुत्वाचा एल्गार करणार्‍या सावरकर, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि शिवसेना या हिंदुत्ववाद्यांनी याबद्दल काय भूमिका घेतली व काय कार्य केले याचा थोडासा विचार करु.

स्वातंत्र्यवीर सावरकर
'हिंदुत्व' हा शब्दच ज्यांनी दिला आणि आधुनिक हिंदुत्व ज्यांनी एका अर्थाने सुरु केलं त्या स्वातंत्र्यवीर सावरकरांचे जात्युच्छेदनामध्ये सर्वात मोठे योगदान आहे. ज्या काळात देशात अस्पृश्यता होती, देशावर अनेक अंधश्रध्दा, कालबाह्य रुढी-परंपरांचा प्रभाव होता तेव्हा सावरकरांसारख्या अस्सल बुद्धिवाद्याने, विज्ञानवाद्याने आणि हिंदुत्ववाद्याने त्यावर अखंड प्रहार केले. आपल्या लेखनाने कोणी सनातनी दुखावेल म्हणून त्यांनी ते विचार मांडणे सोडले नाही. त्यांनी रत्नागिरीमधील वास्तव्यामध्ये अनेक समाजसुधारणा केल्या. जवळपास ५०० मंदिरे अस्पृश्यांसाठी खुली केली. अनेक आंतरजातीय विवाह लावले. अनेक सहभोजने आयोजित केली. त्यांनंतर सर्वांसाठी 'पतित पावन मंदिर' सुरू केले व सर्वांसाठी भोजनालय ही सुरू केले. या सर्वांमुळे सनातनी ब्राह्मण भडकले व सावरकरांना 'धर्मद्रोही' ठरवून 'त्यांना पेशवाई असती तर हत्तीच्या पायाखाली दिले गेले असते' असा ठराव मांडला. त्यावर ३००० ब्राह्मणांनी सह्या केल्या. सावरकरांनी त्यावर 'शिवशाहीत अथवा, पहिल्या बाजीरावाच्या पेशवाईत आमच्यासारख्या हिंदू संघटकांना हत्तीच्या पाठीवरील अंबारीत मिरवले जाण्याचाच संभव अधिक होता' असे सडेतोड उत्तर दिले. 'भटशाही' संपवण्यासाठी पूजा, पाठ, गौरी, गणपती, सोयरसुतक, संक्रांत, दिवाळी, दसरा, द्वादशी यांना भटास बोलावू नका असे सांगितले. त्याचबरोबर काशीतील ब्राह्मण महासंमेलनाची तुलना त्यांनी माकडांशी केली. त्यात 'काशीत दोन महासंमेलने भरली - एक माकड महासंमेलन आणि दुसरे भाकड महासंमेलन. माकडे परिवर्तनीय तरी आहेत. पण सनातनी तर काळ, वेळ, परिस्थिती या गोष्टीच बघत नाहीत. अशा वागण्यामुळे निदान काशीच्या भाकड महासंमेलनातील पंडित हे तरी माकडांची विकसित श्रेणी नसून तेथील माकडेच त्या पंडितांची विकसित श्रेणी आहे हे म्हणणे क्रमप्राप्त आहे' असे लिहित त्याची खिल्ली उडवली. पण अजूनही अशी 'महासंमेलने' आपल्याकडे आयोजित होत आहेत आणि ती करण्यात अनेकांना 'गर्व' आहे यावरून सावरकरांना अपेक्षित असलेला समाज किती दूर आहे हे लक्षात येते. जाती मोडण्यासाठी ब्राह्मणांनीच पुढे यावे हे ही त्यांनी सांगितले.


सावरकरांनी अतिशय स्पष्ट शब्दात जातीव्यवस्थेवर हल्ला केला. अनुवंशात जातीचे मूळ आहे. त्या मुळावरच सावरकरांनी हल्ला चढवत अनुवंश हा आचरटपणा आहे, जर ब्राह्मणाच्या घरी 'ढ'जन्मला तर त्याला 'ढ'च म्हटले पाहिजे आणि जर शुद्रात 'ज्ञ' निघाला तर त्याला 'ज्ञ'च म्हटले पाहिजे, मग त्याचा बाप, आजा अथवा पणजा 'ढ' असो की 'ज्ञ' असो. सावरकरांनी हल्ला करताना 'आपले हिंदुत्वाचे समर्थक दुखावतील' वगैरे फाजिल भीती न बाळगता त्यांचे प्रबोधन केले. सावरकर म्हणतात की 'आज आमच्या हिंदू समाजात पोथीत तसे लिहिले आहे ह्या सोडून इतर कोणत्याही लक्षणाने सहज विभिन्नत्व विविध जातींमधे दिसून येत नाही. जात मानणे ही मूळ चूक! त्यात महादेवाच्या जटेपासून ही जात निघाली आणि ब्रह्मदेवाच्या बेंबीपासून अमुक जात निघाली इत्यादी उपरत्या अक्षरशः खर्‍या मानून त्या त्या जातींच्या अंगी ते ते गुण उपजतच आहेत हे मानणे ही घोडचूक!! अन् तो गुण त्या जातीच्या संतानात प्रकट झाला नसला तरी तो आहेच समजून तशी उच्च-नीचता त्या संतानास भोगावयास लावणे ही पहाड चूक. 'सावरकरांनी मनु:स्मृती जाळली नसली तरी तिचे विचार मात्र जाळले असेच म्हणावे लागेल. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांची 'Annihilate the Caste' हीच शिकवण सावरकरांनी दिली. जातीव्यवस्था मोडण्यासाठी त्यांनी सात बेड्या मोडायला हव्यात हे सांगितले. त्या लेखात ते म्हणतात, पोथीजात जातीभेद हा मनाचा रोग आहे. मनाने तो मानला नाही की झटकन बरा होतो. त्यानंतर त्या सात बेड्या म्हणजे १)वेदोक्तबंदी {स्वतःच्या क्षत्रियादिक धर्मबंधूंनासुध्दा वेदोक्ताचा अधिकार नाही असे म्हणणारी भटबाजी यापुढे चालणार नाही.-सावरकर}२) व्यवसायबंदी ३) स्पर्शबंदी ४) सिंधूबंदी ५) शुद्धीबंदी ६) रोटीबंदी ७) बेटीबंदी. आपल्याकडे अजूनही बेटीबंदी मोठ्या प्रमाणात आहे.सावरकरांनी आंतरजातीय विवाहांना समर्थनच दिले नाही तर स्वतः आंतरजातीय विवाह लावले.

अस्पृश्यता हा गुन्हा ठरवण्यात आला त्या दिवसाची नोंद भारतीय इतिहासात सुवर्णाक्षरांनी करण्यात यावी असे सावरकर म्हणत. त्यानंतरच्या दहा वर्षात अस्पृश्यता संपवली नाही तर अजून शंभर वर्ष त्याला लागतील असेही सावरकरांनी सांगितले जे बर्‍याच प्रमाणात खरे आहे असे दिसून येते. हिंदू महासभेचे अध्यक्ष असताना त्यांनी महासभेच्या कार्यकर्त्यांना व नेत्यांना अस्पृश्यता निवारणासाठी गेल्या २०० वर्षात झाले नाही तितके काम येत्या २ वर्षात करायचे असा आदेश दिला होता. सावरकर प्रखर विज्ञानवादी होते. शुद्धीच्या वेळी गंगामाईचे पाणीही शिंपडायची गरज नाही असे त्यांनी सांगितले. जातीव्यवस्था पाळण्यात दोष सर्वांचा असला तरी गेल्या ८-१० दशकात तरी अस्पृश्यतेसारखी राष्ट्रविघातक रुढी पाळून चातुर्वर्णिक स्पृश्यांनी एक राष्ट्रघातक पाप केले आहे असे ते म्हणतात. सावरकरांचे विचार स्पष्ट होते. ते सनातनास अपरिवर्तनीय सत्य न मानता सत्यास अपरिवर्तनीय - सनातन मानत. जात्युच्छेदनासाठी त्यांची शिकवण फार महत्वाची आहे. पण हिंदुत्ववाद्यांकडून त्यांच्या विचारांकडे बर्‍याच प्रमाणात दुर्लक्ष झालेले दिसते. नवतरुण वर्ग सावरकरांच्या विचारांनी प्रभावित नक्की होऊ शकेल. गरज आहे फक्त एका सक्षम नेतृत्वाची. हिंदुत्ववाद्यांमधे जात्युच्छेदनाच्या कामातील मानबिंदू म्हणजे स्वातंत्र्यवीर सावरकर. शेवटच्या कालखंडात सावरकरांनी सांगितले होते की 'माझी मार्सेलिसची उडी विसरली तरी चालेल पण माझे रत्नागिरीतील कार्य विसरु नका'. हिंदुत्वासाठी, राष्ट्रवादासाठी आणि सर्वात महत्वाचे म्हणजे माणुसकीसाठी जात्युच्छेदन सर्वात महत्वाचे आहे हे सावरकरांनी बरोबर ओळखले होते. आजकाल आपले समर्थक दूर जातील म्हणून फक्त विरोधकांवरच हल्ला करणारे लोक आहेत. त्यामुळेच ते यशस्वी 'राजकीय' नेते आहेत तर सावरकर 'विचारवंत, प्रबोधक व समाजसुधारक' ठरतात.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ
राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर नेहमीच मनुवादी म्हणून टीका केली जाते. त्यांचे याबाबतचे धोरण मलातरी क्लिष्ट वाटते. बरेच स्वयंसेवकही याबाबत गोंधळलेले वाटतात. याबाबत गोळवलकर गुरुजींचा विचार करावा लागेल. श्रीगुरुजींच्या 'विचारधन' मध्ये त्यांनी वर्णव्यवस्थेचे समर्थन केलेले आहे. त्यात ते सांगतात की जातीव्यवस्था आपल्या विकासाच्या आड आली आहे याला काही पुरावा नाही उलट जातीव्यवस्थेमुळे आपली एकता टिकवण्यासाठी मदतच झाली आहे.त्याचबरोबर ब्राह्मण म्हणजे मुख, क्षत्रीय म्हणजे हात, वैश्य म्हणजे मांड्या आणि शुद्र म्हणजे पाय वगैरेही ते विचारधन मध्ये सांगतात. पण अस्पृश्यतेच्या विरुध्द भूमिकाही त्यांनी घेतलेली आहे.'अस्पृश्यता सवर्णांच्या मनातील संकुचित भावाचे नाव आहे' असे ते म्हणत.त्याचबरोबर १९६९ साली उडुपी येथे झालेल्या विश्व हिंदू परिषदेच्या सभेत 'न हिंदू पतितो भवेत! हिंदव: सहोदरा सर्वे!!' म्हणजे कोणीही हिंदू दलित नाही, पतित नाही, अस्पृश्य नाही. तर बंधू आहे. असा प्रस्ताव पारित करण्यात आला. दीनदयाळ उपाध्याय यांनीही आपल्या १९६५ सालच्या भाषणात विराट पुरुषाच्या विविध अवयवांची थिअरी दिली आहे पण त्याचबरोबर पुढे म्हटले आहे की 'पण आम्ही जातींमधील भांडणांचे विरोधक आहोत', म्हणजे थोडक्यात संघाच्या या जेष्ठ नेत्यांना जातीव्यवस्था मान्य होती पण जातीभेद मान्य नव्हता, जातीजातीतील भांडणे मान्य नव्हती. पण जातच नको असे स्पष्ट ते सांगत नाहीत. कोणे एके काळी जातीव्यवस्था जन्मावरून ठरत नसे, जातीव्यवस्थेमुळे समाज एकसंध रहाण्यास पूर्वी मदत झाली वगैरे संघाचे लोक सांगत असतात. अरे पण कोणे एके काळी माणूस उघडा नागडाच रहात असे आणि कच्चे मांस खात असे. पण त्याचा आजशी काही संबंध आहे का? विराट पुरुषाचे विविध अवयव हे एकीसाठी पूरक एकेकाळी नक्कीच होते. डॉ.बाबासाहेब आंबेडकरही १९३६ साली लिहिलेल्या एका लेखात हे मान्य करतात. त्यात ते लिहितात "शरिराचे निरनिराळे अवयव निरनिराळी कामे करू लागल्याने ते एका शरिराचा भाग नाही असे होऊ शकत नाहीत. तद्वतच, क्षत्रिय बाहूपासून, ब्राह्मण मुखापासून, वैश्य मांड्यांपासून, शूद्र पायांपासून उत्पन्न झाले असले तरी ते एका शरिराचा भाग आहेत हे दाखवणे हा पुरुषसूक्ताचा उद्देश आहे असे आम्हाला वाटते. चारी वर्ण मुळात एकच आहेत. श्रमविभागाने झालेला भेद निरर्थक आहे ही शिकवण लोकांना देऊन ऐक्याचा ठसा लोकांच्या मनावर उठवावा या हेतूने पुरुषसूक्त रचले गेले असावे असे आमचे मत आहे."पण ब्राह्मणांनी याचा नेमका उलटा अर्थ लावला असेही बाबासाहेब पुढे लिहितात.

त्यामुळे जुन्या काळी वर्णव्यवस्था उपयुक्त ठरलीही असेल पण सध्या ती कालबाह्यच नव्हे तर राष्ट्रघातक झाली आहे हे सांगायला संघाचे नेते टाळतात असे वाटते. शिवाय संघामध्ये मोठ्या प्रमाणात असलेला अभिजन वर्ग दुखावला जाऊ नये म्हणून संघ सवर्णांचा व मुख्यत्वे ब्राह्मणांचा यात दोष आहे हे ही सांगायला कचरतो असे वाटते. पण याचबरोबर इतरही नेत्यांची वक्तव्ये लक्षात घ्यायला हवीत. बाळासाहेब देवरस यांनी ‘If untouchability is not wrong, nothing in the world is wrong’ असे सुस्पष्ट विधानही केले आहे. त्याचबरोबर २ वर्षांपूर्वी झालेल्या कार्यक्रमात नामदेव ढसाळ यांना बोलावून त्यात सरसंघचालक के.सुदर्शन म्हणाले, 'आम्ही आमच्या शाखेमध्ये कधीच जातीयवाद पाळत नाही. दलित हे आमच्याच रक्ताचे आहेत पण काही कारणांनी चुकीच्या आचरणाने अस्पृश्यता अशा लोकांवर लादली गेली, जे आमच्याच धर्माचे भाग आहेत' पण ज्या जोराने संघ राममंदिर, रामसेतू वगैरे मुद्दे मांडतो त्या जोराने तो जात्युच्छेदनाविरोधी भूमिका नक्कीच घेत नाही. त्याचबरोबर संघाच्या विविध कार्यक्रमांना शंकराचार्यांचे घोळके असतात ज्यामुळे हे काय जात्युच्छेदन करणार अशी शंका साहजिकच येते. संघ दलितांचे उपनयन अथवा दलितांना पुजारी बनवणे वगैरे काम करते पण आंतरजातीय विवाह लावणे संघाला सहज शक्य आहे पण संघ ते कार्य करत नाही (मलातरी माहीत नाही). याबद्दल परिवाराच्या एका वेबसाईटवर या प्रश्नाचे उत्तर असे दिले आहे की आमचा आंतरजातीय विवाहास विरोध नाही पण जर ते लावले तर मागच्या पिढीतील लोक रागावतील व हिंदुत्वापासुन दूर जातील. पण जात्युच्छेदन करायचे असल्यास कोणी ना कोणीतरी दुखावला जाणारच आहे. दुखावले जाणार्‍याची काळजी संघाने करण्याची गरज नाही कारण संघ ही राजकीय पार्टी नाही. प्रबोधन करायचे असल्यास विरोध हा स्वाभाविक आहे. संघ अनेकदा प्रतिगामी भूमिका घेतो असेही दिसते. म्हणजे संघाच्या एका नेत्याने मुलाखतकार मुलीने जीन्स घातली म्हणून दाखवलेली नाराजी अथवा प्रमोद महाजन फाईव्ह स्टार कल्चर आणायचा प्रयत्न करत आहेत म्हणून धुसफूस इत्यादी अनेक छोट्यामोठ्या गोष्टींनी संघ मध्ययुगीन कालखंडात घेऊन जाईल अशी भीती अनेकांना वाटते. याबाबतचा विचार होणे आवश्यक आहे. सध्या संघ ही एकमेव हिंदुत्ववादी संघटना आहे जी देशभर पसरलेली आहे व जिच्याकडे हजारो स्वयंसेवक आहेत व जात्युच्छेदनाचे कार्य तेच व्यवस्थितपणे करु शकतात.

शिवसेना
कडव्या व जहाल हिंदुत्वाचा पुकार करणार्‍या शिवसेनेचा विचार याबाबत करणे आवश्यक आहे असे मला वाटते. बाकी शिवसेना ही एक संघटनाच नाही तर एक राजकीय पार्टी आहे यामुळे त्यांच्या याविषयीच्या कार्यात अनेक मर्यादा आहेत. राजकीय पक्ष कुठलीही अशी भूमिका घेऊ शकत नाहीत ज्यामुळे मतदार दुखावतील. त्यामुळे समाजप्रबोधनास अनेक मर्यादा राजकीय पक्षाला येतात. शिवसेना ही हिंदुत्वाच्या क्षेत्रात उतरलेली शेवटची संघटना आहे. पण जात्युच्छेदनाचे कार्य इतर हिंदुत्ववाद्यांनी सुरुही केले नव्हते तेव्हा शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे वडील प्रबोधनकार ठाकरे यांनी ते मोठ्या प्रमाणात सुरू केले होते. जुन्या काळातील जातीपाती, अनिष्ट रुढी, परंपरा यांना त्यांनी प्रखर विरोध केला होता. शिवसेनाप्रमुखांकडे त्यामुळे हे गुण येणे स्वाभाविक होते. सेनाप्रमुखांनी शिवसेना स्थापन केली तेव्हाच आपले ब्रह्मवाक्य दिले होते की ब्राह्मण-ब्राह्मणेतर, मराठा-मराठेतर, स्पृश्य-अस्पृश्य हे सर्व वाद गाडा आणि सर्वांची एकजूट करा. या भूमिकेवर चालण्यास ते बर्‍याच अंशी यशस्वी ठरलेले आहेत. शिवसेना हा एकमेव राजकीय पक्ष आहे जिथे जातीपातीची छुपी राजकारणे, पायखेची होत नाही. जातीच्या आधारावर नाही तर आर्थिक मागासपणावर आरक्षण द्यावे ही मागणीही त्यांनी अनेक वर्षं लावून धरली आहे. त्याचबरोबर सेनाप्रमुखांनी गरीब आणि श्रीमंत या दोनच जाती आहेत. या दोन सोडल्या तर तिसरी जात नाही अशी जातीव्यवस्थेविरुध्द स्पष्ट भूमिका मांडली आहे त्यामुळे महाराष्ट्राचा पहिला ब्राह्मण मुख्यमंत्री देऊनही त्यांच्यावर 'मनुवादी' असा ठपका बसलेला नाही.


हिंदुत्वाचा झेंडा घेउन जेव्हा शिवसेनाप्रमुख महाराष्ट्रभर फिरले तेंव्हा 'शेंडी-जानव्याचे हिंदुत्व मला करायचे नाही' हे त्यांनी ठासून सांगितले. त्याप्रमाणे वागणूकही ठेवल्याने ओबीसींनी शिवसेनेला भरपूर पाठिंबा दिला. हिंदू धर्माच्या पालनाच्या बाबतीत त्यांनी व्यक्तिगत स्वातंत्र्य दिलेले आहे असे दिसते. तुमच्या मनाला पटेल त्या पध्दती अवलंबा, पण त्या व्यक्तिगत स्तरावर. बाळासाहेबांचे हिंदुत्व हे प्रतिकार व जहाल पद्धतीचे आहे. सर्व जातीच्या लोकांना बरोबर घेऊन, त्यांची जातपात गाडून एक बलाढ्य राष्ट्रवादी शक्ती बनवण्याचा त्यांचा प्रयत्न होता जी शक्ती राष्ट्रद्रोह्यांवर वरवंटा फिरवेल. त्याबद्दल बाळासाहेब म्हणतात की 'या हिंदुस्तानावर आणि हिंदूंवर जो कोणी वाकडी नजर टाकेल त्याला झोडणारं माझ हिंदुत्व आहे. मला मंदिरात घंटा बडवणारा हिंदू नकोय तर धर्मांध, देशद्रोही मुस्लिमांना बडवणारा हिंदू हवा आहे.'सावरकर आपल्या 'हिंदुत्व' पुस्तकात हिंदुत्व आणि हिंदू धर्म वेगवेगळे आहे हे स्पष्ट सांगतात. बाळासाहेबांचे हिंदू धर्मातील विविध धारांपासून दूर असणारे हिंदुत्व सावरकरांना अपेक्षित असलेल्या हिंदुत्वाशी साधर्म्य दाखवणारे आहे. वरती सावरकरांनी शुध्दीच्या वेळी गंगेचे पाणीही शिंपडू नका असे सांगितल्याबद्दल दिले आहे तशाच प्रकारे शिवसेनाप्रमुखांबद्दलची एक घटना देतो. बाळासाहेब कांबळे यांना ख्रिश्चन धर्मातून पुन्हा हिंदू धर्मात प्रवेश करायचा होता. ते शिवसेनाप्रमुखांकडे आले आणि त्यांनी तसे सांगितले. तिथे इतरही हिंदुत्ववादी मंडळी होती त्यांनी सांगितले की आता व्रतवैकल्ये करा, होमहवन, यज्ञयाग वगैरे करा,जेवणावळी वगैरे वाढा. त्यावेळी बाळासाहेब ठाकरे उद्गारले "कसल्या जेवणावळी वाढताय?? त्याला गंध लावा आणि 'जय हिंद' म्हणायला सांगा की झाला तो हिंदू." म्हणजे यज्ञयाग, व्रतवैकल्ये चुकीची आहेत असे नाही. पण त्यात हिंदुत्व अडकवू नका. अर्थातच आपले समर्थक मतदार दुखावतील म्हणुन अनेकदा प्रखर भूमिका कुठल्याही राजकीय पक्षाला घेता येत नाही. त्यामुळे शिवसेनेवर तशी मर्यादा आहे. शिवसेनेने या विषयावर मोठी आंदोलने वगैरे केलेली नाहीत पण त्यांच्या पक्षाचे नियमन व आचरण नक्कीच राजकीय पक्षास स्वागतार्ह आहे. जात्युच्छेदनासाठी संघाने सेनेपेक्षा जास्त काम केलेले असेलही पण संघ ही एक संघटना आहे व सेना ही एक राजकीय पार्टी आहे हे विसरुन चालणार नाही. शिवसेनेने जात्युच्छेदनाचा विचार नक्कीच दिलेला आहे पण समाजाचे प्रबोधन केले आहे म्हणणे नक्कीच धाडसी ठरेल.

सध्याची परिस्थिती व भविष्य
सध्या जातीपातींमधील संघर्ष वाढीला लागला आहे. देशात लोक आपली ओळख म्हणजे जातच सांगतात. जातनिर्मूलनाचे कार्य न झाल्याने जातींचे समूहच बनले आहेत. आमचे 'सोशल इंजिनीअरींग'ही जातीच्याच नावाने होते. विविध जाती स्वतःची 'महासंमेलने' भरवून काय साधत आहेत कोण जाणे? राजकारणातही व्यक्तीची जात बर्‍याच गोष्टी ठरवून जाते. आजही अस्पृश्यता पूर्णपणे संपलेली नाही व खैरलांजीसारखी मानवतेला काळिमा फासणारी प्रकरणे घडत आहेत. विविध जातीच्या नेत्यांनी स्वतःच्या समाजाचे भले करण्यापेक्षा स्वतःचेच 'भले' करुन घेतले आहे. सर्वात दुर्दैवाची गोष्ट म्हणजे जातीनिर्मूलनासाठी सर्व आयुष्य झटणार्‍या डॉ.बाबासाहेब आंबेडकरांची चळवळही आजकाल जातीपुरती सीमित झाली आहे. सवर्णांमधे 'आम्ही कुठल्याही आरक्षणाशिवाय यशस्वी झालो' असे म्हणत श्रेष्ठभाव निर्माण होऊ लागला आहे. त्याचबरोबर अभिजन म्हणजे तो वाईटच असला पाहिजे असा नवजातीवादही येऊ लागला आहे. त्यामुळे जात्युच्छेदनाची आज नितांत गरज आहे. त्यासाठी स्वातंत्र्यवीर सावरकरांसारख्या द्रष्ट्या नेत्याची, विचारवंताची, समाजसुधारकाची आवश्यकता आहे. चर्चिलने एकदा म्हटले होते की 'India is not a nation. It's a collection of tribes.' हे वक्तव्य धादांत चुकीचे आहे असे माझे स्पष्ट मत आहे. पण जात्युच्छेदनाचे काम जर जोरात झाले नाही तर चर्चिलचे वक्तव्य खरे ठरण्याची भीती नक्कीच आहे. आपल्या देशाचे हित यातच आहे की आपण आपली जातपात विसरून एकत्र आले पाहिजे. हिंदुत्ववाद्यांनी यासाठी कार्य करणे जरुरीचे आहे. तथाकथित धर्मनिरपेक्षवादी हे कार्य बिलकुल करणार नाहीत. कारण हिंदू समाज एकत्र व्हावा असे त्यांना वाटतच नाही. तर हिंदूंच्या एकजुटीच्या ते विरुद्ध आहेत. त्यामुळे हिंदुत्ववादाला चांगले दिवस यायचे असल्यास जात्युच्छेदनाला अग्रक्रम हिंदुत्ववाद्यांनी द्यायला हवा. जात्युच्छेदनाशिवाय हिंदूंची एकजूट ही कल्पना वेडगळपणाची आहे.

चिन्मय कुलकर्णी

संदर्भ-
'सावरकर-एक अभिनव दर्शन', savarkar.org, golwalkarguruji.org, sanghpariwar.org

Wednesday, September 17, 2008

सारातोव्ह,रशियातील बाप्पा मोरया!!!!!!!



एकदन्ताय विद्महे वक्रतुंडाय धीमहि तन्नो दन्ति: प्रचोदयात्
आमच्या होस्टेलमध्ये नेहमीप्रमाणे यावर्षीही गणेशोत्सव साजरा झाला. हे आमच्या सारातोव्ह मेडीकल युनिव्हर्सिटीच्या होस्टेलमधील गणेशोत्सवाचे ५ वे वर्ष होते.पहिल्या वर्षी जेमतेम ५-६ जणांनी मिळुन गणेशोत्सव साजरा केला होता पण आता आमच्या गणेशोत्सवाचे रुपांतर एका मोठ्या उत्सवात झाले आहे व आमचे एक छोटेसे गणपती मंडळच स्थापन झाले आहे.मागच्या वर्षीचा गणपती बराच मोठा करण्यात आम्हाला यश आले होते.यावर्षी त्याहुन पुढे जाण्याचा निश्चय होता.त्यासाठी भारतातच सजावट तसेच प्रसाद याचा एक आराखडा बनवण्यात आला व भारतातुन येताना आवश्यक असलेले सामान आणले.त्याचबरोबर गणेशोत्सवासाठीच्या निमंत्रणपत्रिकाही छापुन आणल्या.येथे सजावटीचे सामान घेणे शक्य नव्हते कारण येथे भारतीय वस्तुंची दुकाने नाहीत व येथील सजावटीचे सामान म्हणजे वाढदिवसाच्या सजावटीसारखे दिसते.
यावर्षी राजवाड्यासारखी सजावट करायचे ठरवले होते. त्यासाठी भारतातुन थर्माकॉलचे मोठे सिंहासन आणले.त्यानंतर येथील दुकानांमधे सीलींगची सजावट करण्यासाठी असणारे थर्माकॉलचे साहीत्य आणुन ते एकमेकांना जोडुन ,रंगरंगोटी करुन त्याचे खांब बनवण्यात आले.त्याचबरोबर ६ गणपतीची चित्रे काढण्यात आली व त्या चित्रांच्या बाजुने मखर बनवण्यात आले.त्याचबरोबर लायटिंग व सीलिंगची सजावट करण्यात आली. होस्टेलमधील सर्व कॉरीडॉरना पताका लावण्यात आल्या. हे सर्व करण्यासाठी जेमतेम १ दिवस व २ रात्री मिळाल्या. त्यात सर्व कार्यकर्त्यांनी जिव तोडुन काम केले. २ तारखेला सर्वांना पत्रिका देण्यात आल्या व नोटिस बोर्डवर सर्वांना निमंत्रण व सहभागासाठी विनंती करण्यात आली. ३ तारखेला दुपारी पुजा सुरु झाली. एकीकडे पुजा सुरु झाली होती पण सजावटही पुर्ण झाली नव्हती.त्यामुळे तेही काम एकीकडे चालु होते.त्याचबरोबर प्रसादही बनवण्याचे काम सुरु होते. पहील्या दिवशी मोदक ,शिरा,पंचामृत्,फळे हा प्रसाद होता.जवळपास २०० मोदक बनवण्यात आले होते.साधारण संध्याकाळी ६ पर्यंत सर्व काम झाले.एकीकडे पुजा चालुच होती. साधारण ७ च्या दरम्यान आरती झाली.आरतीला जवळपास ७० मुले होती.'गणपती बाप्पा मोरया' च्या जयघोषाने पुर्ण होस्टेल दुमदुमुन गेले.
दुसर्‍या दिवशीपासुन संध्याकाळच्या आरतीची सुरुवात शंखनादाने होत असे.शंखाचा आवाज ऐकल्यावर सर्व मुले आरतीला येत.मागच्या वर्षीप्रमाणेच यावर्षीही आमच्याकडे दररोज आरती,गणपती अथर्वशीर्षाचे पठन्,प्रसाद ,सांस्कृतिक कार्यक्रम होत.पण त्याचबरोबर यावर्षी अजुन २ गोष्टी आम्ही करु लागलो. पहीली म्हणजे गणेशाच्या नावाचा जप सकाळच्या आरतीनंतर होत असे व त्याचबरोबर संध्याकाळी विविध परंपरांमागचे म्हणजे नमस्कार का करतात्,घंटा का वाजवतात्,प्रदक्षिणा का घालतात इत्यादींमागची भावना,महत्व याची माहीती दररोज सांगण्यात येत असे. ४ तारखेला म्हणजे दुसर्‍या दिवशी सांस्कृतिक कार्यक्रमामधे गणेशोत्सव सुरु करणार्‍या लोअमान्य टिळकांबद्दल एक छोटेसे भाषण झाले.त्यात टिळकांच्या चरीत्राचा आढावा,गणेशोत्सव्,शिवजयंती सुरु करण्यामागचा उद्देश सांगण्यात आला. त्याचबरोबर त्या दिवशी 'देहाची तिजोरी' हे गाणे सादर केले.प्रसादासाठी या दिवशी बेसनाचे लाडु होते.५ तारखेला आमच्या सर्वांचा आवडता कार्यक्रम म्हणजे इस्कॉनच्या भक्तांच्या किर्तनाचा कार्यक्रम होता.मागच्या वर्षीप्रमाणे याही वर्षी या कार्यक्रमाला प्रचंड दाद मिळाली.या दिवशी प्रसाद म्हणुन फ्रुट सॅलड बनवले होते.६ तारखेला प्रश्नमंजुषा झाली.यात मुख्यत्वे धर्माशी संबंधित प्रश्न होते.या दिवशी प्रसाद म्हणुन केळीचे शिक्रण होते.
७ तारखेला रविवार असल्याने सकाळच्या पुजेलाही बर्‍यापैकी गर्दी होती.या दिवशी सकाळी गणपती स्तोत्राची २१ आवर्तने झाली.या संध्याकाळी ट्रेडिशनल डे होता.त्याचबरोबर गणपतीच्या काही कथा सांगण्यात आल्या व 'मल्हार वारी' हे गाणे एका विद्यार्थ्याने अतिशय सुंदररीत्या गायले.या दिवशी गाजराचा हलवा हा प्रसाद करण्यात आला होता.८ तारखेला 'Ganesha Outside Hinduism' या विषयावरील माहीतीपुर्ण भाषण झाले.त्याचबरोबर 'उदे ग अंबे उदे' वर नृत्य व 'सनईचा सुर' या गीताचे समुहगायन झाले.या दिवशी प्रसाद म्हणुन गुलाबजाम बनवले होते.९ तारखेला 'महाराष्ट्राची संत परंपरा' याविषयावर भाषण्,एक नृत्य व एक गाणे हा सांस्कृतिक कार्यक्रम होता. या दिवशी शेवयाची खिर हा प्रसाद बनवला होता.१० तारखेला फॅन्सी ड्रेसचा कार्यक्रम होता.या कार्यक्रमाला अभुतपुर्व प्रतिसाद मिळाला. जवळपास २० जणांनी वेगवेगळी वेषभुषा केली होती.यात विविध देविदेवता,ऐतिहासिक व्यक्ती यांचा समावेष होता.याचबरोबर आमच्या होस्टच्या होस्टिंगने या कार्यक्रमाला वेगळीच मजा आणली.या दिवशी भोपळ्याचा हलवा हा प्रसाद होता.११ तारखेला ध्यानधारणा व एका विद्यार्थ्याने स्वतः गणपतीवर लिहिलेला पोवाडा हे सांस्कृतिक कार्यक्रम होते.या दिवशी लस्सी व फळांचा प्रसाद दाखवण्यात आला.
१२ तारखेचा कार्यक्रम अविस्मरणीय होता.आपल्या मराठी भाषेत म्हणतात की 'साधु संत येता घरा तोचि दिवाळी दसरा'.त्याप्रमाणे यादिवशी आमच्या कार्यक्रमाला भक्तिब्रिंग गोविंद स्वामी महाराज आले होते.याच दिवशी आमच्या शहरात जगन्नाथाची रथयात्रा होती . अशा प्रकारे दुग्धशर्करा योग जुळुन आला होता. आम्ही विद्यार्थ्यांची रथयात्रेलाही मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती. त्यानंतर संध्याकाळी स्वामीजींनी किर्तन केले व सर्वांना भारतिय संस्कृतीचे महत्व पटवुन सांगितले. हा कार्यक्रम खुपच छान झाला.या दिवशी तांदळाच्या खिरीचा प्रसाद दाखवण्यात आला.१३ तारखेला 'सेंटर ऑफ श्री चिन्मोय' च्या लोकांनी येउन बंगाली भाषेतील काही भजने सादर केली.त्याचबरोबर एका विद्यार्थ्याने 'गणनायकाय गणदैवताय गणाध्यक्षाय धिमही' हे गाणे सादर केले व याच दिवशी २ नृत्याचे कार्यक्रमही झाले.त्याचबरोबर 'रांजणगावाला महागणापती' हे समुहगानही झाले.या दिवशी नारळाचे लाडु व लस्सी बनवली होती.त्याचबरोबर गणेशोत्सवात चित्रकला स्पर्धाही ठेवण्यात आली होती. जवळपास १० गणपतीची अतिशय सुंदर चित्रे स्पर्धेसाठी आली होती.त्यावर प्रेक्षकांनी मतदान केले व विजेता निवडुन दिला.विजेत्याला व इतर सहभाग घेणार्‍यांना पारितोषिक वितरण याच दिवशी करण्यात आले.
१४ तारखेला विसर्जनाचे काम खुपच मोठे होते. जवळपास ४०० मोदक बनवायचे होते व ३० लिटर मसाला दुध बनवायचे होते.दर वर्षी विसर्जनाच्या दिवशी संपुर्ण होस्टेलला आम्ही प्रसाद देतो.त्याचबरोबर जे जे विद्यार्थी आरतीला येत त्या सर्वांसाठी म्हणजे जवळजवळ १०० विद्यार्थ्यांसाठी विसर्जनानंतर स्नेहभोजन ठेवले होते. हे सर्व बनवण्याचे मोठे काम कार्यकर्त्यांवर होते. अगदी सकाळपासुन सर्वजण कामाला लागले होते ते काम संध्याकाळी ६ वाजेपर्यंत चालले.एकीकडे स्वयंपाकाचे काम चालु असताना दुसरीकडे पुजा व अथर्वशीर्षाची ५४ आवर्तने झाली.संध्याकाळी ७ वाजता आरती झाली.त्यानंतर वाजतगाजत आणि 'पुढच्या वर्षी लवकर या' च्या घोषणांसकट गणपती व्होल्गा नदिवर विसर्जनासाठी नेण्यात आले.जवळपास ६० जण विसर्जनासाठी आले होते.विसर्जनानंतर पुर्ण होस्टेलला मोदक व मसाला दुध हा प्रसाद देण्यात आला व पुजेला येणार्‍यांचे स्नेहभोजन झाले.
विसर्जनानंतरचे १-२ दिवस सर्वच कार्यकर्त्यांसाठी फारच खराब जातात.दहा दिवस पुर्ण जीव तोडुन काम केलेले असते,स्वतःच्या हातानी आणि मोठ्या कष्टानी जी सजावट केलेली असते ती काढावी लागते.अभ्यास्,क्लासेस्,लेक्चर्स सांभाळुन हे सगळे उभे करणे व दहा दिवस चालवणे ही खुप मोठी गोष्ट आहे असे मला वाटते.इतर वेळी सर्वजण स्वतःच्या आयुष्यामध्ये गुंतलेले असतात ते सर्व विनातक्रार एकत्र येतात व एकत्र येउन काम करतात .ही गोष्ट आपण गरज पडल्यास आपापसातली भांडण विसरुन एकत्र येउ शकतो व काहीतरी विधायक कार्य करुन दाखवु शकतो हा विश्वास निर्माण करते.आता परत सर्वांची दिनचर्या पुर्वव्रत होउ लागली आहे,पण कुठेतरी काहीतरी खटकतय्,काहीतरी नाहीये,काहीतरी हरवलय याची भावना मनात आहे.गणपतीच्या इतर दिवशी उत्साहानी नाचणारी मंडळी विसर्जनाला नाचु शकली नाहीत.माझे तर हे येथील गणेशोत्सवाचे शेवटचे वर्ष होते.वर्षातील सर्वात अविस्मरणिय असे क्षण गणेशोत्सवात येतात्.पण आता हे परत होणार नाही.पुढच्या गणेशोत्सवात कुठे असेल माहीत नाही पण इथे होतो तसा गणेशोत्सव तिथे होईल का नाही शंकाच आहे. रुसवे -फुगवे असले तरी होस्टेलमधले विद्यार्थी म्हणजे एक मोठे कुटुंबच असते. असे इतके मोठे कुटुंब पुढे कधी लाभणार आहे??माझ्या आयुष्यातले सर्वात अविस्मरणिय क्षण दिल्याबद्दल या कुटुंबाचे आणि गणराया तुझे लाख लाख धन्यवाद!!!!!!!
चिन्मय कुलकर्णी

Wednesday, August 13, 2008

रशिया-जॉर्जिया युध्दातील विरोधाभास



रशिया आणि जॉर्जियातील युध्द आज थांबले आहे.पण जसे हे युध्द सुरु झाले तसेच या युध्दातील विरोधाभास स्पष्टपणे दिसुन येउ लागला.मुळात रशियातील जे परदेशी नागरीक व इंग्रजी भाषा समजारे व आंतरराष्ट्र्यि मिडियाचे दर्शक असणारे रशियन नागरीक यांना तर या युध्दाने एकदमच confuse करुन टाकले.त्यामुळे युध्द सुरु करण्यात हात नक्की कुणाचा होता हे अजुनही येथे स्पष्ट झालेले नाही. आंतरराष्ट्रिय मिडीया म्हणजे सीएनएन्,बीबीसी पुर्णपणे जॉर्जियाच्या बाजुने बातम्या देत होता व रशियन मिडीया त्याच्या बरोबर विरुध्द बातम्या देत होता.

एक गोष्ट मात्र नक्की की जॉर्जियाचे राष्ट्रपती मिहाईल(मायकल) साकश्विली यांनी आंतराष्ट्रिय मिडियाचा अतिशय चांगल्या पध्दतीने वापर करुन घेतला.मुख्य म्हणजे त्यांना इंग्रजी येत असल्याने त्यांचा पत्रकारांशी थेट संवाद होत होता व ते सतत मिडीयाच्या बरोबर राहुन आपली वक्तव्ये करत होते. तर त्याच्या बरोबर विरुध्द रशियन मिडीया जॉर्जियाची कशी चुक आहे व जॉर्जियन राष्ट्रपती कसे खोटे बोलत आहेत हे दाखवत होते.एका बातमीमध्ये साकश्वीली रस्त्यावर बुलेट प्रुफ जॅकेट घालुन आलेले सीएनएन,बीबीसीने दाखवले होते त्याच्या रशियन मिडीयानी चांगलाच समाचार घेतला.बातमीच्या आधीच्या फुटेजमधे साकश्विली मनसोक्त हसताना रशियन मिडीया ने दाखवले व सांगितले की 'यांचा देश अतिशय मोठ्या संकटात आहे हे साकश्विली सांगतात आणि इथे तर मनसोक्त हसत आहेत्'.मग थोड्या वेळानी साकश्विली यांनी पत्रकारांना सांगितले की रशिया कसा हल्लेखोर आहे ,त्यानंतर मग आकाशातुन कसलातरी आवाज आला आणि एकदम साकश्विली आणि त्यांचे अंगरक्षक पळापळ करु लागले आणि नंतर साकश्विली खाली बसले व त्यांना वरुन व इतर सर्व बाजुंनी अंगरक्षकांनी गराडा घातला.यावेळी आंतरराष्ट्रिय मिडीयानी सांगितले की आकाशातुन जॉर्जियावर हल्ला होण्याची शक्यता आहे वगैरे.याचा समाचार घेताना रशियन मिडीयानी दाखवले की हा सर्व साकश्विली यांनी केलेला स्टंट होता कारण अस इतक लगेच घाबरुन जाण्यासारख काहीच झाल नव्हत. नंतर परत अशीही पुस्ती जोडली की साकोश्वीली सगळ्या जॉर्जियन्सना सांगत आहेत की 'घाबरु नका' आणि साकोश्विली स्वतःच घाबरले आहेत.

एकीकडे जॉर्जियन राष्ट्रपती रशिया वर सगळा दोष टाकत होते आणि असेही सांगत होते की रशियाने बीबीसीच्या पत्रकारांवर हल्ला केला त्याचवेळी रशियन मिडीया जॉर्जियावर दक्षिण आसेतियन लोकांवर जॉर्जिया करत असलेल्या 'जिनोसाईड्'चा इतिहास देत होता.जॉर्जियन राष्ट्रपती असेही म्हणत होते की 'जॉर्जिया हा जगातल्या सर्वात चांगल्या लोकशाही देशांपैकी एक देश आहे' तर रशियन वरीष्ठ पत्रकार सांगत होते की जॉर्जिया जगातला सर्वात मोठा शस्त्र खरेदी करणारा देश आहे.जॉर्जियाने विविध देशांकडुन खरेदी केलेल्या शस्त्रांची यादीही रशियन मिडीया दाखवत होता. जॉर्जियाने गेल्या ५ वर्षात आपले डीफेन्स बजेट ३० पटीने का वाढवले आहे,इतक्या लहान देशाला १ अब्ज डॉलर्स इतक डिफेन्स बजेट कशाला लागत्,तसेच जॉर्जिया जगातला सर्वात चांगला लोकशाही देश नाही तर सर्वात जास्त युध्दसामग्री खरेदी करणारा देश आहे हे सांगत होते.

यामध्ये अमेरिकेच्या भुमिकेचाही उहापोह झाला. साकश्विली अमेरिकेने यात हस्तक्षेप करावा व लष्करी मदत करावी अशी भुमिका घेत होते.त्याचबरोबर जॉर्ज बुश यांनीही रशियावर सहकार्य करत नसल्याचा आरोप केला.रशियाने मात्र फक्त 'अमेरिका या सर्वाच्या मागे आहे' एव्हढ म्हणनच बाकी ठेवल होत.रशियाचे पंतप्रधान व्लादिमीर पुतीन यांनी अमेरीकन डिप्लोमॅट्स व 'एक माणुस'(वाचा-जॉर्ज बुश) यामागे आहेत असे जवळपास स्पष्ट बोलत होते तर रशियाचे राष्ट्राध्यक्ष दिमित्रिय मिदवेदोव म्हणत होते की आमचे पश्चिमेकडिल 'पार्टनर्स' आम्हाला समजुन घेत नाहीत व त्यांनी साकोश्विलींच्या बोलण्यावर फारस लक्ष देउ नये.रशियाच्या युएन मधल्या ब्युरोक्रॅटनी मात्र सडेतोड उत्तर दिली.अमेरिकेचे १२३ वरीष्ठ अधिकारी जॉर्जियात काय करत आहेत्,अमेरिका जॉर्जियन सैन्याला इराकमधुन स्वतःच्या दळणवळणाच्या साधनांतुन जॉर्जियात वापस का आणत आहेत असे सडेतोड प्रश्न विचारत होता.त्याचबरोबर रशियन मिडीया अशीही बातमी देत होते की अमेरीकेनी जॉर्जियन सैनिकांना खास प्रशिक्षण दिले आहे त्याचबरोबर एक कृष्णवर्णीय अमेरिकनही यात मरण पावला आहे.तो अमेरीकेचा सैनिक असावा असे त्यांचे म्हणने होते.

हा मुळ वाद तसा जुनाच आहे.पंधरा वर्षांपुर्वी फाळणीवादी आसेतियन्सनी मोठा उठाव केला होता.रशियाचे म्हणने आहे की त्यावेळी जॉर्जियाने हजारो आसेतियन्सचे 'जिनोसाईड' केले.त्यानंतर रशियन शांतीदुत दक्षिण आसेतियात गेले.त्यानंतर रशिया म्हणत होता की उत्तर आसेतियन्सप्रमाणे दक्षिण आसेतियन्सनाही रशियात यायचे आहे.त्यांनी जवळपास २०००० आसेतियन्सना रशियन पासपोर्ट दिले.म्हणजे थोडक्यात हे लोक रशियाचे नागरीक झाले.आधी फाळणीवाद्यांनी हल्ले करायला सुरुवात केली असे जॉर्जिया म्हणते आहे.मग जॉर्जियाने त्श्किनवाली वर हल्ला केला ज्यात रशियाचे काही शांतीदुत व रशियाचे नागरीक्(आसेतियन ज्यांना रशियाने पासपोर्ट दिले) मारले गेल्याने रशियाने प्रतिहल्ला केला.जॉर्जियाचे राष्ट्रपती म्हणत आहेत की रशियाने प्रथम हल्ला केला आणि त्यांचा उद्देश जॉर्जियावर हल्ला करुन सत्ता उलथवण्याचा आहे.साकश्विली रशियन सरकारला मुख्यकरुन व्लादिमीर पुतीन यांना अजिबात आवडत नाहीत कारण साकश्विलींनी पुतीन यांना 'लिलिपुतीयन' म्हणुन हिणवले होते.पुतीन असेही म्हणुन गेले की साकश्विली बरोबर बोलणी होउ शकत नाहीत्.

आज फ्रान्सचे राष्ट्रपती निकोलस सार्कॉझी मॉस्कोत आले व त्यांनी मिदवेदव यांच्याशी चर्चा केल्यावर रशियने शस्त्रसंधी केली.पण अमेरीका व युरोपियन देशांचा या युध्दामागे हात असण्याची शक्यता नाकारता येत नाही कारण नॅटो मधे गेलेल्या रशियन एन्व्हॉयनी मे२००८ मध्येच जॉर्जिया युध्दाच्या तयारीत आहे असे वक्तव्य केले होते.मात्र रशियात रहाणार्‍या लोकांना नक्की कुणावर विश्वास ठेवावा हे कळत नाही आहे कारण आंतरराष्ट्रिय मिडीया व रशियन मिडीया एकदम परस्परविरोधी विधाने करत आहेत.
शनिवार १६ ऑगस्ट २००८
बाकी काल रशियन मिडीयाला चांगलच कोलित सापडल. फॉक्स न्युज वर एका पत्रकाराने दोन दक्षिण आसेतियन स्त्रीयांना बोलावले व त्यांना विचारले की तुम्हाला काय सांगायचे आहे. त्यांनी सांगायला सुरुवात केली 'जॉर्जियन रणगाड्यांनी आमच्यावर हल्ला करायला सुरुवात केली .त्यात रशियन सैन्याचा हात नव्हता.आम्ही रशियन सैन्याचे आभार मानतो की त्यांनी आमच्याविरुध्द होणारे जिनोसाईड थांबवले.' असा एकदमच अनपेक्षित सुर आल्याने मुलाखतकार घाबरलाच. त्यानी लगेच ब्रेक घेतला.मग ब्रेकनंतर त्यानी सांगितल की 'काही तांत्रिक कारणांमुळे आम्ही हा कार्यक्रम पुढे चालु ठेवु शकत नाही.'त्यानी दुसर्‍या महीलेला म्हटले की तुम्ही ३० सेकंदात तुमचे मत नोंदवा. ती म्हणाली 'मला माहीती आहे की तुम्हाला हे ऐकायच नाहीये पण माझ्या घरावर आधी जॉर्जियन रणगाड्यांनी हल्ला केला.माझा मुलगा त्यात मरण पावला.जॉर्जियन सैन्याने आधी केलेल्या हल्ल्याने २००० आसेतियन्स मरण पावले आहेत्.याला साकश्विली व जॉर्जियन सरकार जबाबदार आहे'. लगेच मुलाखतकाराने कार्यक्रम थांबवला.हे जरी त्यांनी टि.व्ही.वर दाखवल नाही तरी हा व्हिडीओ इंटरनेटवर लीक झाला.त्यामुळे काल दिवसभर रशियन न्युज चॅनेल्स दाखवत होते की कशा प्रकारे अमेरीकन मिडीयाचा अमेरीकेला पाठींबा आहे वगैरे.

Wednesday, August 6, 2008

शिवरायांबद्दल परदेशी इतिहासकारांनी काढलेले उद्गार



शिवाजी महाराजांच्या जीवनाचा अनेक परदेशी इतिहासकारांनी आढावा घेतला.काही शिवकालीन होते तर काही नंतरचे होते.यांनी शिवरायांच्या कार्याचे कशा पध्दतीने अवलोकन केले आहे यातुन परदेशी लोक शिवाजी महाराजांबद्दल काय विचार करतात हे दिसुन येते. त्यापैकी काही उद्गारांचे भाषांतर करत आहे.

Thevenot म्हणतो-शिवाजी राजांचे डोळे तीक्ष्ण होते,आणि त्यातुन असामान्य बुध्दिमत्ता दिसुन येत असे.राजे दिवसातुन एकदाच जेवण करतात आणि ते निरोगी आहेत.

Cosmo Da Guarda म्हणतो-शिवाजी राजांच्या कृतीत धडाडी होतीच पण त्याचबरोबर त्यांच्या आचरणात्,चालीत एक जिवंतपणा व उत्साह होता.त्यांचा चेहरा स्वच्छ आणि गोरा होता,निसर्गाने त्यांना सर्वोत्तम गुण दिले होते मुख्य म्हणजे त्यांचे काळे डोळे ज्यातुन जणुकाही अग्निज्वाळा येत असत्,आणि याला जोड होती तीव्र्,तीक्ष्ण बुध्दिमत्तेची.

Orme म्हणतो-शिवाजी महाराजांकडे एका यशस्वी सेनापतीचे सर्व गुण होते.सैन्याचा प्रमुख म्हणुन त्यांनी जितके जमिनीवर जितके अंतर पार केले तितके दुसर्‍या कुठल्याही सेनापतीने केले नसेल.आणीबाणीचा प्रसंग कितीही आकस्मिक अथवा मोठा असला तरीही शिवाजी राजांनी त्याचा विवेकाने व धैर्याने त्वरीत यशस्वीपणे सामना केला.

General Sullivan म्हणतो-ज्या संत्रस्त काळात शिवाजी महाराज रहात होते त्या काळात सफल होण्यासाठी आवश्यक असलेला प्रत्येक गुण त्यांच्यामधे होता.ते सतर्क होते आणि त्यांची कृती प्रखर व धाडसी असे.त्यांच्यातील सहनशीलता,उर्जा आणि निर्णयक्षमतेमुळे कुठल्याही काळात त्यांच्याकडुन गौरवास्पद कार्य झाले असते.तो एक हिंदु राजा होता ज्याने आपल्या देशी घोड्यांच्या सहाय्याने प्रचंड मुघल घोडदळाला पाणी पाजले.त्यांचे मावळे गनिमी काव्यामुळे त्याकाळातले जगातील सर्वात चांगले पायदळ होते

J. Scott म्हणतो-शिवाजी राजे एक योध्दा म्हणुन असामान्य होते,राज्यकर्ता म्हणुन निपुण होते तर सद्गुणी लोकांचे मित्र होते.त्यांनी हुशारीने आपली धोरणे आखली तर दृढतेने ती अमलात आणली.कोणीही कधीही त्यांच्या ध्येयाबद्दल अवगत नसे तर प्रत्येक जण त्या ध्येयाच्या पुर्तीबद्दल अवगत असे.

Douglas म्हणतो-कुठल्याही आणीबाणीच्या समयाच्या वेळी सजग राहुन शिवरायांनी त्याला तोंड दिले.या कलेमध्ये त्यांच्या करंगळीत जेव्हढ होत तेव्हढ औरंगजेबाच्या पुर्ण शरीरात नव्हता.जणुकाही शिवाजी राजे एक डोळा उघडा ठेवुनच झोपत.त्यांनी आपल्या जादुई स्पर्षाने आणि प्रेरणादायी व्यक्तिमत्वाने त्यांच्या गरीब्,आज्ञाधारक,दैववादी महाराष्ट्रातील जनतेला अलौकीक कृत्ये करण्यास प्रेरीत केले.ही जनता सर्वोत्तम सैनिक्,पक्के सरदार्,कुशल राजनिती विशारद बनली जिने शेकडो युध्दे जिंकलेल्या मुघलांचा सामना केला.

Abbe Carre म्हणतो-शिवाजी राजे पुर्वेने पाहिलेल्या सर्वोत्तम योद्ध्यांपैकी एक आहेत.त्यांच्या धाडसीपणामुळे ,त्यांच्या युध्दातील चपळाईमुळे व इतर गुणांमुळे त्यांची तुलना स्विडनच्या महान राजा ऍडॉल्फसशी होउ शकते.त्यांच्या जलद गतीने आणि दयाशीलतेने ज्युलियस सीझरप्रमाणे त्यांनी त्यांच्या शत्रूंचीही मने जिंकली ,जे शत्रु त्यांच्या शस्त्रांमुळे दहशतीत होते.

Dr. John F. G. Careri ( 1695 A. D. ) म्हणतात-हे शिवाजी राजे इतके बलाढ्य आहेत की ते एकाच वेळी प्रचंड मुघलांबरोबरही लढतात आणि पोर्तुगिजांबरोबरही लढतात. ते रणांगणावर ५०००० घोडे आणतात आणि त्याहुनही जास्त पायदळ आणतात.त्यांचे सैनिक मुघलांपेक्षा कितीतरी चांगले आहेत. हे सैनिक अतिशय थोड्या अन्नावर दिवस काढतात तर मुघल बायका,विविध साधनसामग्री,तंबु घेउन जातात जणुकाही ते एक चालत फिरत शहरच असत.

Daughlas म्हणतो-शिवाजी महाराज खडकांमधे रहात.त्यांची शक्ती म्हणजे डोंगर दर्‍या होत्या.हा किल्ल्यांमधला माणुस होता ज्याचा जन्मही किल्ल्यामधे झाला होता.किल्ल्यांनी त्याला बनवल आणि त्यानी किल्ल्यांना बनवल.हे किल्ले म्हणजे भारताची दहशत होती,शिवरायांच्या राज्याचे उगमस्थल होते,त्यांच्या युध्दांचा आधार होते,त्यांच्या ध्येयांच्या पायर्‍या होते,त्यांचे घर आणि आनंद होते.त्यांनी अनेक किल्ले बांधले आणि सर्व किल्ले त्यांनी बळकट केले.ही फारच कृपेची गोष्ट होती की शिवाजी राजे दर्यावर्दी नव्हते.नाहीतर जमिनीप्रमाणे समुद्रावरही त्यांनी वर्चस्व गाजवले असते जे वर्चस्व त्यांनी जवळजवळ प्रस्थापित केले होते.त्यांना समुद्र आवडत असे पण समुद्राला ते आवडत नसत.त्यांचे खार्‍या पाण्यावर इतके प्रेम होते की असे म्हणतात की त्यांनी सिंधुदुर्ग बांधताना स्वतःच्या हातानी हातभार लावला होता.त्यांच्या पावलांचे ठसे अजुनही तिथे दाखवता येतात्,काळाच्या वाळुत नाही तर ठोस खडकात.

Da Guarda म्हणतो-शत्रुमध्ये असा दृढ विश्वास निर्माण झाला होता की शिवाजीराजे सगळीकडे आहेत.ते एकाच वेळी अनेक ठिकाणि चढाई करत असत आणि सर्वच ठिकाणी सैन्याचे नेत्रुत्व तेच करत असत.ह्या प्रश्नाला अजुनही उत्तर मिळालेले नाही की शिवाजी राजे स्वतःच्या नावानी दुसर्‍या कुणालातरी पाठवत असत का त्यांना जादु टोना येत असे का स्वतः सैतान त्यांच्या जागी कार्यरत होता.

Sir E. Sullivan म्हणतात-शिवाजी राजे हिंदु इतिहासातील सर्वोत्कृष्ठ राजकुमार आहेत.त्यांनी आपल्या ज्ञातीचा पुरातन गौरव वापस आणला जो अनेक शतकांच्या पराधिनतेमुळे नष्ट झाला होता.आणि मुघल साम्राज्याच्या परमोच्च बिंदुला त्यांनी आपले साम्राज्य बनवले,वाढवले जे की हिंदुस्तानातील मुळ लोकांनी काढलेले आत्तापर्यंतचे सर्वश्रेष्ठ साम्राज्य आहे.

Kincaid म्हणतो-शिवाजी राजे हे मराठा देशाचे मुक्तिदाते होते,त्यांचे गुण विभिन्न होते,जीवन नियमीत होते,स्वभाव सहनशील होता त्यामुळे यात काही आश्चर्य नाही की त्यांचे लोक त्यांना त्यांच्यापैकी एक न मानता त्यांना देवाचा अवतार मानतात.ज्याप्रमाणे अथेन्सचे रहीवासी त्यांचे साम्राज्य लयास जाउन भरपुर कालखंड गेला असुनही भक्तीभावाने Theseus चे पुजन करतात त्याचप्रमाणे मराठे ,शिवरायांच साम्राज्य संपुन भरपुर काळ लोटला तरी अजुनही राजगड्,मालवण मधे त्यांचे पुजन करतात.

Elphinstone म्हणतो-शिवाजी राजांसारखा प्रतिभासंपन्नच औरंगजेबाच्या चुकांचा फायदा उठवु शकतो त्यानंतर धर्मासाठी प्रेरीत करु शकतो व यातुन मराठ्यांमधे राष्ट्राभिमान जाग्रुत करु शकतो.या भावनांमुळे त्यांचे साम्राज्य अशक्त हातांमधे गेल्यानंतरही तग धरुन होते आणि अनेक अंतर्गत समस्या असुनही भारताच्या एका मोठ्या भागावर त्याने नंतर प्रभुत्व निर्माण केले.

Owen म्हणतो-वीरता,देशाभिमान्,धर्माभिमानाची प्रभावळ त्यांच्या(जनतेच्या) कार्यवाहीत होती ज्यातुन ते प्रेरीत झाले.त्यामुळे शहाजी राजांच्या पुत्रास ते पुर्वनिश्चित,दैविक कृपापात्र मुक्तिदाता मानत होते.त्यामुळे शिवाजी राजे व त्यांचे अनुयायी असे मानु शकतात व मानत की त्यांच्या पध्दतीने मुस्लिमांबरोबर केलेल्या युध्दामुळे ते देवासाठी व मनुष्यासाठी एक चांगले कृत्य करत आहेत.ज्यामुळे त्यांचा गौरव झाला,त्यांचे फक्त स्वागतच झाले नाही तर प्रशंसनिय रीत्या प्रतिकात्मक लाभही झाला.

टिप्-मुळ इंग्रजीतील वाक्यांमधे Shivaji असा उल्लेख आहे.त्याचे शब्दशः भाषांतर केल्यास शिवाजी असा एकेरी उल्लेख येतो.वाचनकर्त्यांच्या सोईसाठी वर शिवाजी महाराज्,शिवाजी राजे व शिवराय असे शब्द वापरले आहेत.वाक्यांचे शब्दशः भाषांतर करण्याचा प्रयत्न केला आहे पण हा माझा पहीला अनुवाद असल्याने काही चुका असण्याची शक्यता आहे.त्याबद्दल क्षमस्व. सर्व परदेशी लोकांच्या उद्गारांनंतर शेवटी एक भारतीयाने काढलेले उद्गार देतो.

कविराज भूषण म्हणतो-जंभासुरला जसा इंद्र , समुद्राला जसा वाडवाग्नी,गर्विष्ठ रावणाला ज्याप्रमाणे प्रभुराम, मेघाला ज्याप्रमाणे वादळ,मदनाला जसे शिव शंकर, सहस्रार्जुनाला ज्याप्रमाणे परशुराम,वृक्षाना ज्याप्रमाणे वणवा, हरिणांना जसा चित्ता,अंधाराला जसा प्रकाश, कंसाला ज्याप्रमाणे श्रीकृष्ण,त्याचप्रमाणे नरसिंह असणारे शिवराय म्लेंच्छांचा नाश करतात

Tuesday, July 22, 2008

'कम्युनल' विरोधाच्या नावाखाली चालणारा संधिसाधुपणा

भारत देशात जरी हिंदु बहुसंख्य असले तरी त्यांच्यासाठी बोलणारा 'कम्युनल' म्हणजे सांप्रदायिक ठरतो.आणि हे ठरवणारे म्हणजे भारतातील बहुतांश धर्मनिरपेक्ष पक्ष आणि धर्मनिरपेक्ष पत्रकारीता.पण जर का याचा नीट अभ्यास केला तर अस दिसुन येत की सांप्रदायिक शक्तींना विरोधाचे कारण पुढे करुन प्सुडोसेक्युलर पक्ष संधिसाधुपणा करतात्.यामधे अनेक उदाहरणे देता येतील्.सध्याचच सगळ्यात गाजणार उदाहरण म्हणजे समाजवादी पक्ष्.

समाजवादी हा मुळात मुस्लिम लोकांमधे प्रसिध्द असलेला पक्ष्.या पक्षातील नेत्यांनी हिंदुंवर कारसेवा करायला गेले म्हणुन गोळ्याही झाडल्या होत्या.मागच्या लोकसभेच्या निवडणुकांपुर्वी 'आम्ही ज्यांना पाठींबा देउ तेच सरकार बनवतील' अशा थाटात यांचे मुलायम सिंग आणि अमर सिंग वावरत होते.पण निकालांनंतर चित्रच पालटल.कधी नव्हे ते कम्युनिस्टांचे ५२ खासदार निवडुन आले आणि त्यांनी काँग्रेसला बिनशर्त पाठींबा दिला.त्यांच्या व इतर युपीए च्या घटक पक्षांच्या आधारे सरकार बनणार हे स्पष्ट झाल्यावर समाजवादीच्या नेत्यांनी केलेल्या वल्गना खोट्या ठरल्या आणि त्यांच्याशिवायच सरकार बनु लागले.मग अमर सिंग तरीही काँग्रेसच्या स्नेहभोजनाला 'बिनबुलाये मेहमान' बनुन गेले.आधीच सरकार येणार हे स्पष्ट झाल्याने सोनिया मॅडम निश्चिंत होत्या त्यांनी सरळ सरळ 'अमर सिंग येथे काय करत आहेत??' म्हणुन त्यांना जवळपास हाकलुन दिले.त्यानंतर अगदी मागच्या वर्षीपर्यंत अमर सिंग 'काँग्रेसनी आमचा कसा अपमान केला' हे सांगत फिरत होते.पण मायावतींनी त्यांचा फडशा पाडल्यावर मात्र त्यांना महत्व मिळत नव्हते.आणि शेवटी अणुकरारावरुन डाव्यांनी सरकारचा पाठींबा काढल्यावर लगेच तेच अमर सिंग सोनिया व इतर काँग्रेस नेत्यांकडे फेर्‍या मारुन भाव खाउ लागले.आणि कारण सांगताना सांगु लागले की 'कम्युनल' पक्षांना सत्तेपासुन दुर ठेवण्यासाठी आम्ही सरकारला पाठींबा देत आहोत्.त्याचबरोबर कम्युनल आडवाणींपेक्षा बुश बरे अशीही टुम सध्या उडवत आहेत्.पण या सर्व निरर्थक गोष्टी आहेत हे तेही जाणतात आणि आपणही जाणतो.मुळात बसपचा 'हत्ती' अडवण्यासाठी काहीतरी करणे आवश्यक आहे म्हणुन समाजवादीने केलेला हा संधिसाधुपणा आहे.राष्ट्रीय पटलावर आपल महत्व दाखवुन देण्याचा प्रयत्न आहे.यात कम्युनल विरोध कुठेच नाही.मुलायम सिंग युपीच्या निवडणुका हरल्यावर अनेक कार्यक्रमात सांगत फिरत होते की 'राजकारणात कुणीही कायमचा शत्रु अथवा मित्र नसतो'.हे वाक्य सगळ काही सांगुन जात्.म्हणजे वेळ आली तर आम्ही काँग्रेसबरोबरच काय तर भाजपबरोबरही युती करु शकतो असे यात स्पष्ट होते.मग कम्युनल विरोध आलाच कुठुन???

दुसरा संधिसाधु पक्ष म्हणजे करुणानिधींचा द्रविड मुन्नेत कळघम म्हणजे 'द्रमुक'.यांचा संधिसाधुपणा तर फारच स्पष्ट आहे. हिंदुंना 'चोर' म्हणणार्‍या आणि आयुष्यभर हिंदुविरोध करणार्‍या या पक्षाने मागच्या वेळी त्यांच्याच वैचारीक शत्रु असलेल्या भाजपला पाठींबा दिला.आणि गेले ४ वर्ष तेच भाजपाला पाठींबा देणारे करुणानिधी आता म्हणतात की 'भाजपसारख्या सांप्रदायिक पक्षांना दुर ठेवण्यासाठी धर्मनिरपेक्ष पक्षांनी एकत्र याव्.कम्युनल पार्ट्या हिंदु मुस्लिम एकीसाठी मारक आहेत्'.आता कम्युनलविरोधाचा मुखवटा चढवुन द्रमुक त्यांच्या कट्टर विरोधी असलेल्या काँग्रेसशी युती करुन आहे.भारतीय राजकारणात सर्वाधिक विरोधाभास असलेली ही युती आहे.राजीव गांधीची हत्या करणार्‍या 'एलटीटीइ'ला द्रमुकचा पाठींबा होता आणि अजुनही तो पाठींबा आहे असे म्हणायला वाव आहे.मुळात राजीव गांधी हत्येची चौकशी करणार्‍या जैन आयोगाने 'द्रमुक नेतृत्वावर कायदेशीर आरोप ठेवणे शक्य आहे' असा अहवाल दिल्यानंतर काँग्रेस्-द्रमुक युती व्हायची शक्यताच निर्माण व्हायला नको होती.द्रमुकचा जन्म जिच्यापासुन झाला ती जस्टिस पार्टी काँग्रेसची स्वातंत्र्यलढ्यात कडवी विरोधक होती.काँग्रेस स्वातंत्र्यासाठी चळवळ करत होता तेंव्हा ही पार्टी ब्रिटीशांना समर्थन देत होती,काँग्रेसने सरदार पटेलांच्या नेतृत्वाखाली देश एकसंध ठेवला होता तेंव्हा द्रमुक 'द्रविडनाडु' या देशाची मागणी धरुन होता,काँग्रेसने हिंदी भाषा राष्ट्रभाषा असावी म्हणुन महात्मा गांधींपासुन तशी भुमिका घेतली होती तेंव्हा कट्टर हिंदीविरोधाचे नेत्रूत्व द्रमुक करत होता,राजीव गांधींनी श्रीलंकेत शांतीसेना पाठवली त्याकाळात तर द्रमुक लंकेतील तामीळींसाठी चिडला होता.इतका प्रचंड विरोधाभास असलेली द्रमुक-काँग्रेस युतीही 'कम्युनल्'ला सत्तेपासुन दुर ठेवण्यासाठी झाली.पण ही करताना (तसे सांगताना तरी),त्याच कम्युनल भाजपबरोबर आपण ५ वर्ष सरकारात राहीलेलो आहोत हे द्रमुक विसरतो.

देवेगौडांचे सेक्युलर जनता दल तर संधिसाधुपणा लपवायचाही प्रयत्न करत नाहीत्.आपण कधी इकडे तर कधी तिकडे अशी सततची पळापळ करुन आपल्याला कुठलीही वैचारीक बैठक नाही हे त्यांचा पक्ष दाखवुन देत असतो.आत्ता परवाच एकाच दिवशी युपीए बरोबर आणि युपीए विरोध्यांबरोबर देवेगौडा दिसले होते.यांनी काँग्रेसबरोबर युती करुन धरम सिंग यांचे सरकार कर्नाटकात आणले आणि मग लगेच ते पाडुन भाजपाबरोबर सरकार आणले.त्यांचा मुलगा २० महीने मुख्यमंत्री आणि पुढचे २० महीने भाजपचा मुख्यमंत्री असेल असे ठरले.पण स्वतःचा मुख्यमंत्रीपदाचा कार्यकाल संपल्यावर कारभार भाजपकडे सोपवण्यास गौडांनी नकार दिला मग परत काँग्रेसबरोबर जायचा प्रयत्न केला आणि ते जमत नाही म्हणुन परत भाजपला पाठींबा दिला आणि ७ दिवसात तो काढुनही घेतला.हे सगळ करत असताना आपला संधिसाधुपणा उघडा पडतोय याचीही त्यांना चिंता नव्हती.मग देवेगौडांनी मुलाचा निर्णय होता असे म्हणुन सारवासारव केली. हे सर्व होतानाच आपल्या पक्षाचे नाव सेक्युलर आहे म्हणुन कम्युनल राजकारणाचा विरोधही ते अधुनमधुन करतात्.पण काहीच दिवसात परत ते भाजपबरोबर युती होउ शकते असेही सांगतात. आत्ताच काही दिवसांपुर्वी 'केंद्रात भाजपबरोबर युती होउ शकते' असेही त्यांनी स्पष्ट केले आणि हे केल्यानंतर काहीच दिवसात दिल्लीचे वारे पलटले आणि त्यात आपणही बातम्यांमधे याव म्हणुन धर्मनिरपेक्षांचा पंगतीत जाउन देवेगौडा परत बसले आहेत.

या सर्वांपेक्षा मायावतींची बहुजन समाज पार्टी तरी बरी.कारण ते सरळ सरळ हे मान्य करतात की 'आम्ही संधिसाधु आहोत.फायद्यासाठी आम्ही कुणाबरोबरही जाउ'.संसदेत एकदा कांशीराम म्हणाले होते की 'आम्ही संधिसाधु आहोत असे तुम्हीच म्हणता आणि वरुन आम्ही भाजपबरोबर गेलो म्हणुन टिकाही करता.मग तुम्हीच सांगा की आम्ही कुणाबरोबर जाव की ज्यामुळे आमचा फायदा होईल?'.जुन्या काळी मनुवादी म्हणुन ,कम्युनल म्हणुन ज्यांच्यावर टिका बसपने केली,त्यांच्याच बरोबर बसपने अनेकदा युतीही केली.सध्या पक्ष देशभरात वाढवण्यासाठी मायावती प्रयत्न करत आहेत्.ते करण्यासाठी वेळ पडल्यास 'कम्युनल' पक्षांशी युती करतील आणि वेळ पडल्यास त्यांना 'कम्युनल' आहेत म्हणुन विरोधही करतील्.बाकी युपीए सरकारला बाहेरुन पाठींबा देताना उत्तर प्रदेशच्या विकासाबरोबर जातीयवाद्यांना विरोध हाही मुद्दा होताच की!सध्या मायावती देशात युपिबाहेर सगळीकडे स्वतःचे उमेदवार उभ्या करत आहेत आणि याचा फायदा अप्रत्यक्षपणे भाजपाला होतोय.कारण त्या काँग्रेसचा मतदार स्वतःकडे खेचत आहेत.गुजरातमधे १५-१६ काँग्रेसचे मतदार त्यांनी घरी बसवले तर कर्नाटकात १०-११ काँग्रेसचे उमेदवार त्यांच्यामुळे हरले.अनेकदा भाजपबरोबर युती करणार्‍या आणि नरेंद्र मोदींसारख्या कट्टर हिंदुत्ववाद्याच्या प्रचारासाठी सभा घेणार्‍या मायावती राष्ट्रपतीपदासाठी काँग्रेस उमेदवाराला पाठींबा देताना म्हणाल्या की 'भाजपला पाठींबा देण्याचा प्रश्नच येत नाही कारण ते कम्युनल आहेत.कम्युनल पक्षांना कुठल्याही प्रकारे मदत व्हायला नको म्हणुन बसपने नेहमीच लढा दिलेला आहे'.असे असले तरी त्यांनी संधिसाधुपणा मान्य केलाय हे तरी ठिक आहे.

बाकी एका दृष्टीने राष्ट्रवादीवरही हा आरोप ठेवला जाउ शकतो.कारण सोनियांच्या परदेशी मुळाचा मुद्दा घेउन राष्ट्रवादीची स्थापना झाल्यावर काहीच महीन्यात महाराष्ट्रात त्यांनी काँग्रेसशी युती केली आणि सरकार बनवले.ते करताना 'राष्ट्रिय स्तरावर हे होणार नाही 'हे सांगितले आणि मग हळुहळु पवार भाजपकडे झुकु लागले.वाजपेयींचा उघड गौरव करु लागले.मग काही जागांवरुन बोलणी फिस्कटल्यावर पवारांनी सोनियांच्या काँग्रेसबरोबर लोकसभेसाठी निवडणुकपुर्व युती केली.मग त्यांच्या सरकारातही ते सामील झाले.'सोनिया पंतप्रधान आमच्याशिवायच होतील म्हणुन आम्ही त्यांना पाठींबा देतो' असे पवारांनी सांगितले.आणि हे केल्यानंतर सोनियांनी पंतप्रधानपद नाकारले.त्यानंतर काहीच महीन्यात महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुका होत्या.त्यात शरद पवारांनी असेही सांगितले की 'सोनिया पंतप्रधान होणार नाहीत हे स्पष्ट झाल्यावर कृषीमंत्रीपद स्विकारले'.पण हे करत असताना 'डबल कम्युनल' शिवसेनेशी ते संबंध ठेवुन आहेत्.पुण्यात त्यांची सेनेशी युतीही आहे.

याप्रमाणे प्सुडोसेक्युलर कम्युनलच्या नावाखाली संधिसाधुपणा करतात्.तर या कम्युनल पक्षांचा इतका खरच दोष आहे का???आणि खरच हे पक्ष कम्युनल आहेत का हा प्रश्न कोणीच विचारत नाही.महाराष्ट्रात तर सेना-युती शासनाच्या वेळी सांप्रदायीक दंगे जवळपास झालेच नव्हते.नरेंद्र मोदींना धर्मनिरपेक्ष लोक शिव्या देत असतात पण १९६९ साली गुजरातमधे २००२ सालपेक्षा कितीतरी मोठी दंगल उसळली होती हे विसरतात्.अनेक दंगली धर्मनिरपेक्ष सत्तेवर असताना झाल्या आहेत तरीही शिवसेना-भाजप सारखे पक्ष सत्तेत आल्यास अराजक माजेल असे एक चित्र निर्माण केले जाते जे साफ चुकीचे आहे.मुळात हिंदुंवरील अन्याय आणि हेटाळणी बंद केली तर आपोआपच या पक्षांचा जनाधार कमी होईल्.पण हे लक्षात न घेता धर्मनिरपेक्ष पक्ष सत्तेत येताच हिंदुविरोध सुरु करतात्.रामसेतुचा मुद्दाही त्यातलाच्. भाजप्-शिवसेना या पक्षांना कम्युनल म्हणने कितपत बरोबर आहे हाही एक मुद्दा आहेच्.धर्मांध मुस्लिम देशविरोधी कारवाया करु शकतो म्हणुन त्यांच्या धर्मांधतेला आळा घालण्याची मागणी कम्युनल कशी ठरते??एका दृष्टीने बघितल्यास कम्युनला शक्तींना सत्तेपासुन दुर ठेवण्याच्या नावाखाली प्सुडोसेक्युलर संधिसाधुपणा करतात्.त्यामानाने शिवसेना-भाजप युती गेले २० वर्ष एका मुद्द्याच्या जोरावर टिकुन आहे.अनेकदा त्यांच्यातले संबंध ताणले गेले पण सत्तेसाठी संधिसाधुपणा करण्यासाठी त्यांनी त्यांच्या तत्वांशी तडजोड टाळली आहे.

Saturday, May 31, 2008

शौर्य

काही दिवसांपुर्वी 'शौर्य' हा चित्रपट पाहीला. राहुल बोस्,केके मेनन हे यातील अभिनेते. चित्रपट तसा ठिक आहे. 'अ फेव गुड मेन' नावाच्या इंग्रजी चित्रपटावरुन उचलेगिरी केलेली आहे पण त्याला हिंदु-मुस्लिम्(नेहमीप्रमाणे)रंग दिलेला आहे.चित्रपटाच्या समीक्षेपेक्षा त्यात दाखवलेल्या घटनांबद्दल लिहीत आहे. त्यामुळे चित्रपटाची थोडक्यात कथा लिहितो. जावेद खान नावाच्या लष्करातील अधिकार्‍यावर आपल्या वरिष्ठ अधिकार्‍याच्या हत्येचा आरोप असतो.राहुल बोस जावेद खानचा वकील असतो.जावेद खानने आपला वरीष्ठ अधिकारी राठोडची हत्या केलेली असते.राहुल बोसने पत्रकाराला दिलेल्या चुकीच्या मुलाखतीमुळे ब्रिगेडिअर प्रताप (केके मेनन) यात ओढला जातो.नंतर शोध घेता घेता राहुल बोसच्या लक्षात येते की राठोड हा माणुस फार क्रुर होता व त्याला ब्रि.प्रताप पाठीशी घालत असे.शेवटी ब्रि.प्रतापला न्यायालयात बोलावण्यात येते.राहुल बोस त्याला उकसवतो व त्याच्या मृत कुटुंबाबद्दल सांगतो. त्याच्या संपुर्ण कुटूंबाची त्याच्याच मुस्लिम नोकराने निर्घुण हत्या केलेली असते. ब्रि.प्रतापच्या ८ वर्षाच्या मुलीवर बलात्कारही केलेला असतो. हे सर्व राहुल बोस कोर्टात सांगुन ब्रि.प्रतापला त्या नोकराबद्दल ऍन्युअल कॉन्फिडेंशिअल रीपोर्टमधे न लिहिण्यामागचे कारण कसले भय तर नाही ना असे विचारतो. स्वतःला शौर्यवान समजणारा ब्रि.प्रताप तोंड उघडतो. सर्व मुस्लिमांना मारुन टाकायला हवे वगैरे सांगतो हे सर्व बोलल्यानंतर ब्रि.प्रतापवरच कोर्टमार्शल होते व जावेद खानला सोडुन देण्यात येते.
केके मेननने जबरदस्त अभिनय केलेला आहे त्याचप्रमाणे राहुल बोसनेही चांगली भुमिका केली आहे.
नेहमीप्रमाणे या चित्रपटात हिंदु कसे कृर आणि मुस्लिम कसे शांतीप्रिय देशभक्त असे दाखवण्यात आले आहे.काश्मिरमधे दहशतवाद आहे पण या दहशतवादाला भारतील लष्करच जबाबदार आहे असेही अप्रत्यक्षपणे दाखवले आहे. म्हणजे लष्करातील मुस्लिमविरोधी अधिकारी निष्पाप मुस्लिमांना मारुन टाकतात व त्यांच्यावर दहशतवादी असल्याचा आरोप ठेवतात.बंदुक डोक्यावर ठेवुन 'माझ्याकडे एके ४७ आहे' हे वदवुन घेउन त्यांना मारुन टाकतात. याला रोखणे शक्यच नाही कारण वरीष्ठ लष्करी अधिकार्‍यांचा अशा कृत्यांना आशिर्वाद असतो.पण हे करताना शेवटी वेगवेगळ्या वर्तमानपत्रातील बातम्यांच्या हेडलाईन्स दाखवल्या आहेत. ज्यापैकी बर्‍याच आसाम,मणिपुर मधील आहेत. म्हणजे दिग्दर्शकाला दाखवायचे आहे की त्याचे म्हणने कसे बरोबर आहे. पण या आसाम्,मणिपुर मधील बर्‍याचशा घटना हिंदुंवर झाल्या होत्या हे दिग्दर्शक विसरतो.
माझ्यामते हा चित्रपट बनवताना लष्करातील सैनिकांची,अधिकार्‍यांची मनस्थितीच विचारात घेतलेली नाहीये.लष्करात काम करताना लष्करी अधिकार्‍यांवर किती दबाव असतो याकडे पुर्णपणे दुर्लक्षच केले आहे. माझे काही मित्र,नातेवाईक लष्करात होते , आहेत यांनी असे सांगितले आहे की काश्मिरात काम करताना अधिकार्‍यांवर प्रचंड दबाव असतो. कधी कुठे बॉम्बस्फोट होईल सांगता येत नाही. तो झाल्यानंतर दहशतवादी पळुन जातात त्यांचा शोध घेणेही खुप अवघड असते.शिवाय या दहशतवाद्यांना बर्‍याचदा जनतेचा पाठींबा असतो. ते दहशतवाद्यांना लपायला मदत करतात. कधीकधी लष्कराचे खबरी चुकीची माहीती देतात्.त्यामुळे दिशाभुल होते. अशा अनेक कारणांमुळे लष्कराकडुन कधीकधी चुका होतात. ज्या होणे स्वाभाविकही आहे.पण चुकांवर लष्करात कारवाईही होते.
या चित्रपटात असे दाखवले आहे की राठोड नामक अधिकारी निष्पाप लोकांच्या हत्यांवर हत्या करत असतो व मेडल्स मिळवत असतो.एका ठिकाणी एका निष्पाप मुस्लिम तरुणाची तो हत्या करतो व एका लहान मुलीवरही तो गोळी झाडणार असतो. जावेद खान त्याला म्हणतो की तू जे करतो आहेस ते चुकिचे आहे.पण राठोड अजुन लोकांची हत्या करण्याआधीच जावेद खान त्याची हत्या करतो.जावेद खानची नंतर यातुन सुटका होते. शेवटी राठोड चुक होता हे मान्य पण जावेद खानने त्याच्या वरीष्ठ अधिकार्‍यावर गोळी घालुन एका प्रकारे कायदा मोडलाच होता ना???मग त्याला का सोडण्यात येते???लष्करात एक शिस्त असते. आदेशाचे कारण न विचारता पालन करणे हा तिथे नियम असतो. जर लष्करातील सर्वच सैनिक स्वतःच काय बरोबर काय चुकीचे ठरवु लागले तर लष्करात अराजक माजेल. सुरक्षा करणे शक्यच होणार नाही.समजा उद्या भारतीय सरकारने व लष्कराच्या अतिवरीष्ठ अधिकार्‍यांनी एखाद्या देशाबरोबर युध्द करण्याचा चुकीचा निर्णय घेतला. जर लष्करातील सैनिक म्हणु लागले 'हा निर्णयच चुकीचा आहे.यामुळे निष्पाप लोकांची फाल्तु जिवितहानी होईल्.त्यामुळे आम्ही या युध्दात भाग घेणार नाही', तर काय होईल??सैन्यातील लोक जर स्वतःच ठरवु लागले की काय चुक आहे,काय बरोबर आहे आणि स्वतःच इतरांवर गोळ्या झाडुन हत्या करू लागले आणि नंतर न्यायालयात स्वतःची बाजु बरोबर आहे हे पटवल्यावर सुटू लागले तर सैन्यात आपापसातच युध्द होईल.या चित्रपटात जावेद खानचे जरी बरोबर होते तरी त्याने लष्करी कायदा व शिस्त मोडली म्हणुन त्याला काहीतरी शिक्षा व्हायलाच हवी होती.
केके मेननचा अभिनय चित्रपटात सुंदर आहे पण अनेक चुकीच्या गोष्टी चित्रपटात दाखवलेल्या आहेत व त्या चुकीच्या गोष्टी अनेक लोकांना बरोबर वाटत आहेत त्यामुळे हे सर्व लिहिले.

Tuesday, May 13, 2008

राजसमर्थक राजु परुळेकर यांस ,

तुम्ही तुमच्या लेखात आंबेडकर्,अत्रे यांचे वारसदार दिवाळखोर निघाले म्हटले आहे.आंबेडकरांचे राहु द्या पण अत्र्यांचे वारसदार म्हणजे आजचे पत्रकार तर नंबर एकचे दिवाळखोर आहेत.एव्हढेच नव्हे तर 'पत्रकार धर्म' विसरुन राजकीय कंपुबाजीत सगळे धन्यता मानत आहेत. राजु परुळेकरही त्यातलेच.अत्र्यांनी त्यांच्या वृत्तपत्रातुन सतत मराठीचा मुद्दा धगधगत ठेवला.पण राजु परुळेकर मायावाती,मोदी व इतर अनेकविध विषयांवर आपली मते मांडत होते.-------------------------------------------------------


राजसमर्थक राजु परुळेकर यांस ,
आपला लोकप्रभातील 'होय हा महाराष्ट्र धर्म आहे ' हा 'अविचार' वाचला.लेख इथे वाचा -http://www.loksatta.com/lokprabha/20080509/maha.htm
लेखामधील अनेक गोष्टी बरोबर आहेत (ज्याचा मी विरोध करत नाही).अतिशय अभ्यासपुर्ण काही मुद्दे मांडले आहेत उदा.बाबासाहेब आंबेडकरांचे मुद्दे. पण ८ बरोबर मुद्द्यांमधे २ निव्वळ चुकिचे तपशील घुसवुन तेही अभ्यासपुर्ण आहेत असे भासवुन दिशाभुल करण्याचा प्रयत्न केला आहे.मला ७०% लेखात चुक वाटत नाही.काँग्रेस नेत्यांबद्दल लिहिलेल्या गोष्टीही बरोबर आहेत.पण शिवसेनेवर केलेल्या आरोपांमधे तर निव्वळ द्वेशभावना दिसते. शिवाय सर्वात मोठा आक्षेप(जो आजकाल जवळपास सगळ्याच पत्रकारांबाबत आहे)तो म्हणजे 'राजकीय कंपुबाजी'.

तुम्ही एक वाक्य लिहिल आहे की '१९९० पासुन शिवसेनेनी महाराष्ट्र धर्माच जेव्हढ नुकसान केल आहे तेव्हढ काँग्रेसनीही केलेल नाहि'.तुमच म्हणन अस आहे की शिवसेनेनी हिंदुत्व भैय्यांसाठी पत्करल.बाळासाहेबांनी सत्तेसाठी ड्रेस बदलला. याबद्दल मी सांगु इच्छितो की बाळासाहेबांनी पुर्वीपासुनच धर्मांध मुस्लिमांविरुध्द भुमिका घेतलेली आहे. आर्.के. करंजिया यांच्या त्या काळातील प्रसिध्द 'ब्लिट्स' या साप्ताहीकाने बाळासाहेबांच्या नेहमीच्या मुस्लिम व कम्युनिस्ट विरोधी भुमिकेमुळे त्यांच्यावर अनेकदा तिखट हल्ले केले होते. बाळासाहेबांनी १९८० मधे म्हटल होत की "They [Muslims] were spreading like a cancer and should be operated on like a cancer. The...country should be saved from the Muslims and the police should support them [Hindu Maha Sangh] in their struggle just like the police in Punjab were sympathetic to the Khalistanis". १९७२ साली ए.सी.भक्तिवेदांत स्वामी प्रभुपादांनी मुंबईतील इस्कॉन मंदिरावर होणार्‍या हल्ल्याविरुध्द बाळासाहेब ठाकर्‍यांकडे मदत केली होती. प्रभुपादांच्या चरित्र ग्रंथात बाळासाहेबांचा उल्लेख 'हिंदु अधिकारांसाठी लढणार्‍या नेत्यांमधील मुंबईतील सर्वात मोठा नेता' असे आहे.

तुम्ही पुढे असेही लिहिता की "हिंदुत्वाचे तुणतुणे वाजवुन शिवसेनेनी महाराष्ट्राची उर्जा दिल्ली,भैयांच्या सरंजामशाही अर्पित केली". शिवाय तुम्ही संघालाही विरोध केलेला आहेच म्हणजे एकुणच हिंदुत्व म्हणजे 'उत्तर भारतीयांपुढील लाचारी' असा तुमचा गैरसमज झालेला दिसतो.तुम्हाला मी सांगु इच्छितो की हिंदुत्व ही संकल्पनाच मुळात महाराष्ट्राने दिलेली आहे. हिंदुत्वाचे प्रेरणास्थान असलेले छत्रपती शिवाजी महाराज हे मराठीच होते तर वासुदेव बळवंत फडकेही(father of militant nationalism and Hindutva) मराठीच होते.स्वातंत्र्यवीर सावरकरांपासुन ते हेगडेवारांपर्यंत आणि गोळवलकर गुरुजींपासुन बाळासाहेब ठाकर्‍यांपर्यंत हिंदुत्वाचे महत्वाचे नेते मराठी आहेत. लोकमान्य टिळकांनाही हिंदुत्वाचे पितामह म्हटले जाते तर तुम्ही उल्लेख केलेल्या प्रबोधनकार ठाकर्‍यांनीही 'हिंदुत्व' नावाचे पुस्तक लिहिले होते,जातीपातींच्या सीमा गाडण्यासाठी अनेक अनिष्ट प्रवृत्तींवर प्रखर टिका केली होती व त्याचप्रमाणे प्रबोधनकारांनी ख्रिश्चन मिशिनरीजच्या धर्तीवर हिंदु मिशिनरिज बनवाव्यात अशी संकल्पनाही मांडली होती.तर अशा अनेक थोर मराठी व्यक्तिमत्वांनी(बाळासाहेब ठाकरे वाचु नका) हिंदुत्व देशाला दिले.या महान लोकांच्या भुमिकेला विरोध करणे म्हणजे महाराष्ट्र धर्मालाच विरोध करणे आहे. या लोकांनी काय हिंदुत्व भैय्यांसाठी केले काय??

हिंदुत्वानीच मराठी माणुस दिल्लीवर वर्चस्व ठेवु शकतो असे मला वाटते.मागे एनडीए सरकारने काही निर्णय घेतल्यावर काँग्रेस व धर्मनिरपेक्ष पक्षांनी म्हटले होते की 'हे सरकार दिल्लितुन नाही तर नागपुर,पुण्यातुन चालते'. बाळासाहेबांनी घेतलेल्या प्रखर भुमिकेमुळे दिल्लीही हादरत असे.एक-दोन उदाहरण देतो.वाजपेयी सरकार पाकीस्तानशी क्रिकेट खेळण्याचा निर्णय घेउ लागले तेंव्हा शिवसेनेनी मुंबईतील वानखेडे स्टेडीयमचे पिच खोदले व 'मुंबईत सामना होउ देणार नाही' असे बजावले. वाजपेयींना भुमिका बदलावी लागली. दिल्ली महाराष्ट्रापुढे बिनशर्त झुकली.फारुख अब्दुल्लांच्या 'नॅशनल काँफरन्स्'ने एनडिए सरकारला पाठिंबा दिला व फारुक अब्दुला राष्ट्रपती बनवावेत अशी अट ठेवली. वाजपेयींनी ती मान्य केली. बाळासाहेब पुन्हा बरसले आणि 'ऑटोनॉमीची मागणी करणार्‍या फारुख अब्दुल्लाला राष्ट्रपती बनवु नये'. पुन्हा युपीचे वाजपेयी महाराष्ट्राच्या बाळासाहेंबांसमोर गप्प झाले. खर्‍या महाराष्ट्रप्रेमी माणसाला या गोष्टींचा आनंद होतो. अजुन एक गोष्ट सांगावी वाटते ती म्हणजे पाकिस्तानला भारताने २० दहशदवाद्यांची मागणि केल्यावर ,पाकिस्तानने 'आम्हाला बाळ ठाकरे द्या' अशी मागणि केली होती.काही पाकीस्तानी लोकांनी मला सांगितल होत की 'पाकीस्तानका बच्चा बच्चा बाल ठाकरेको जानता है और उसको गाली देता है'. भारताच्या शत्रु राष्ट्रातील लोक एका अशा माणसाला घाबरतात ज्याच्याकडे एकही पद नाही व तो माणुस माझ्या महाराष्ट्राचा आहे याचा खर्‍या महाराष्ट्रप्रेमीला अभिमान वाटतो.बाळासाहेबांच्या बोलण्याने दिल्ली तर हादरतेच पण पाकिस्तानही हादरते हे यातुन स्पष्ट होते. सरंजामशाहीची उपमा किती मुर्खपणाची आहे हे यातुन स्पष्ट आहे. तुम्ही स्वतःच लिहिता की 'उत्तर भारतावर मुघली साम्राज्याचा पगडा आहे'. मग या मुघली साम्राज्याच्या पगडा असलेल्यांसाठी बाळासाहेबांनी धर्मनिरपेक्ष राजकारण केले असते ना!!!!मुळात बाळासाहेबांनी पुर्वीपासुनच हिंदुत्व आणि मराठी हे दोन्हीही मुद्दे घेतले होते. ज्याची ज्या वेळी जास्त गरज त्याच्यावर त्या वेळी त्यांनी जास्त emphasis दिलेला आहे. तुमच्या म्हणन्याप्रमाणे जर सेनेनी मराठीत्व सोडलेच असते तर मग हिंदुत्वाच्या मुद्द्याशी फारकत घेउन प्रतिभाताईंना फक्त 'मराठी महीला' म्हणुन राष्ट्रपतीपदासाठी पाठिंबा दिलाच नसता.युती शासनाने परप्रांतीयांचे येणे थांबवण्यासाठी 'पर्मिट सिस्टीम'आणायचा प्रयत्न केला होता हा तपशील तुम्ही कसा काय विसरलात??बाळासाहेबांनी 'पॉप्युलॅरिस्ट पॉलिटीक्स' केलेले नाही ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळेच शिवसेना आत्तपर्यंत फक्त एकदाच शासन करु शकली आहे.हिंदुत्वाचा मुद्दा असुनही २ वर्षापुर्वी झालेल्या मुंबई बाँबहल्ल्यांनंतर ज्या मुस्लिमांनी रॅलीज काढुन हल्ल्याचा निषेध केला त्या मुस्लिमांना बाळासाहेबांनी सलाम केलेला आहे.मागच्या गणेशोत्सवात लालबागच्या गणपती समोर मुस्लिमांनी फटाके फोडून मिरवणुकिचे स्वागत केले तेंव्हा बाळासाहेबांनी अग्रलेखातुन त्या मुस्लिमांचे अभिनंदन केले होते.काही लोकांना ही बाळासाहेबांची धरसोड वृत्ती वाटते .मला वाटते 'जे मनात ते ओठात' अशी सरळ वृत्ती आहे.

आता जैनांच्या टॉवर्सचा मुद्दा.सेनाप्रमुखांनी जेंव्हा वाढदिवसाला मुंबईतील बिल्डर्सना 'टॉवर्समधील ५०% जागा मराठी माणसाला द्याव्यात' असा दम भरला होता तेंव्हा तुम्ही लोकप्रभा मधे 'शाब्दिक खेळ' करुन याला अप्रत्यक्षपणे विरोध केला होता हे विसरु नये.शिवाय त्याच लेखात तुम्ही बाळासाहेबांना नेहरुंचे उदाहरण देउन सहिष्णुतेचे धडे दिले होते. आता त्याच नेहरुंचे तुम्ही कट्टर विरोधक बनला आहात.बाळासाहेबांना सहिष्णुतेचे धडे देणारे राजु परुळेकर एकदम मनसेच्या भैयांविरुध्दच्या मारामार्‍यांना 'स्वाभिमान्,अस्मिता' म्हणुन बिनशर्त पाठींबा देतात्.अरेच्चा, मग सहिष्णुतेच काय झाल???का राज ठाकरेंना तो नियम लागु होत नाही??कृष्णा देसाई ते श्रीधर खोपकर यांच्या उदाहरणातुन तुम्ही रमेश किणीला खुबीने वगळता.हे double standards का??आता महाराष्ट्र धर्म ,संस्कृती म्हणणारे तुम्ही त्याच लेखात लिहिता की 'मुळात मराठी असो अथवा अन्य कुठली असो ,संस्कृती ही वाढते वा तिचा र्‍हास होतो.चंद्राप्रमाणे तिची अवस्था असते.ती टिकवता येत नाही.' आता राज ठाकरेंनी शिवसेनेचा मुद्दा घेतल्यावर तुम्ही त्यांना का सांगत नाही की 'संस्कृती चंद्राप्रमाणे असते ,टिकवता येत नाही.तुम्ही टिकवायचा प्रयत्न करु नका'. पण नाही आता तुमचे म्हणने आहे की मुंबईत मराठी संस्कृती टिकवली जाउ शकते. तीनच महिन्यात इतका वैचारीक फरक???

संजय निरुपम जेंव्हा सेनेत होता तेंव्हा त्यानेही भुमिपुत्रांची भुमिका जोरात मांडली होती.अनेक कार्यक्रमांमधे त्याने 'परप्रांतियांचे मुंबईत येणे रोखले पाहीजे' असे दणकावुन सांगितले होते. ते कार्यक्रम मी स्वतः बघितले आहेत्.आता पार्टी बदलली आणि तोही बदलला.उध्दव ठाकरेंनी छट पुजेला हजेरी लावली तर काही महत्पाप केले असे मला बिल्कुल वाटत नाही. आम्ही परदेशात राहुन गणेशोत्सव्,शिवजयंती साजरी करतो.त्याला परदेशी लोक उपस्थित असतात्.मग परदेशात कोणी म्हटले की 'इथे फक्त याच देशाचे सण साजरे करा' तर ते चुकिचे आहे.तुम्ही म्हणता की 'राज ठाकरे बदलणार नाहीत ना हा प्रश्नच गौण आहे'. याचा काय अर्थ आहे??तेही उद्या बदलणार असतील तर मराठी माणसाने त्यांना का पाठींबा द्यावा???शिवाय त्यांच्या पक्षाचे बदलणे आत्तच सुरु झाले आहे.खालील बातमी वाचा-http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/2889253.cmsज्या वेळी भैय्यंना मारल्याच्या जखमाही भरल्या नव्हत्या त्या वेळी मनसे भैय्यांबरोबर उत्तर प्रदेशि स्टाईलमधे होळी खेळत होता.याचा तुम्ही का विरोध केला नाही??पण उध्दवने भैय्यंच्या सणाला उपस्थिती लावली तर ते चुकिचे पण राजची मनसे भैय्या स्टाईलमधे धुमधडाक्यात होळी साजरी करते ते चालते??भैया चालत नाहीत ना मग मनसेतले चौबे का कोण ते,रीटा गुप्ता,हिंदी साहित्यिक वागीश सारस्वत तुम्हाला कसे चालतात???इंडीअन एक्प्रेसला अशीही बातमी होती की मारामार्‍यांनंतर मनसेतील भैय्यांचे सदस्यत्व वाढले आहे.माझा विरोध भैय्यांबरोबर होळी साजरी करण्याला नाही पण त्याचप्रमाणे सेनेच्या नेत्यांच्या युपी सणांच्या उपस्थितीलाही नाही.

आता मराठीचा मुद्दा-भैय्या इथे येउन मराठी शिकत नाहीत ,मराठी संस्कृतीशी एकरुप होत नाहीत असा आक्षेप घेतला जातो.माझा प्रश्न असा आहे की मुस्लिमांचे काय्???ते तर इथे पिढ्यानपिढ्या रहात आहेत पण त्यांना मराठी बोलता येत नाही.८०-९०% महाराष्ट्रीय मुस्लिम उर्दुच बोलतात. मराठी संस्कृतीशी त्यांना काहीही देणघेण नाही.त्यांना फक्त इस्लामी संस्कृती महत्वाची वाटते.त्यांच्या विरुध्द तुम्ही कधीच काहीच का लिहित नाही??ज्या बाबासाहेब आंबेडकरांचे मुद्दे तुम्ही भरभरुन दिले आहेत तेच बाबासाहेब मुस्लिमांबद्दल बघा काय म्हणतात(मुळ मराठी शब्द सध्या उपलब्ध नाहीत्,अनुवादात अर्थबदल केला असा माझ्यावर आरोप होउ नये म्हणुन उपलब्ध असलेला मुळ हिंदी अनुवाद देत आहे) "मुसलमानों के लिए है कुरान गैर मुसलमान को मित्र बनाने का विरोधी है इसलिए हिन्दू सिर्फ घृणा और शत्रुता के योग्य ही हैं मुसलमानों की निष्ठा भी केवल मुस्लिम रास्त्रो के प्रति होती है इसलाम सच्चे मुसलमान हेतु भारत को अपनी मातृभूमि और हिन्दुओ को अपना निकट सम्बन्धी मानने की आज्ञा नहीं देता, संभवतः यही कारण था की मौलाना मोहमद अली जैसे भारतीय मुसलमानों ने भी अपने शरीर को हिंदुस्तान की अपेक्षा येरुशेलम में दफनाना अधिक पसंद किया कांग्रेस में मुसलमानों की स्थितियो के सम्पर्दायिक चौकी की तरह है गुंडागर्दी मुस्लिम राजनीती का स्थापित तरीका हो गया है इस्लामी कानून समाज सुधर के विरोधी हैं वे धर्मनिरपेक्षता को नहीं मानते हैं मुस्लिम कानूनों के अनुसार भारत हिन्दुओ और मुसलमानों की समान मातृभूमि नहीं हो सकती वे भारत जैसे गैर मुस्लिम देश को इस्लामिक देश बनाने में जिहाद 'आतंकवाद' का संकोच नहीं करते."आता या मुस्लिमांविरुध्द बाळासाहेबांनी आघाडी उघडली तर काय चुकल???बर तेही सोडा. मुंबईत जवळपास ५-७लाख बांग्लादेशी आहेत. त्यांना इथल्या भाषेशी ,संस्कृतीशी काहीही देणघेण नाही,ते भारताच्या (फक्त मराठी ओळख असणार्‍यांनी हा शब्द 'मराठी लोकांना' वाचावा) आंतरिक सुरक्षेला सर्वात मोठा धोका आहेत.हे मी म्हणत नाही तर सुपरकॉप के.पी.एस.गिल म्हणतात. त्यांना हाकलण्यासाठी तुम्ही कधीच का लिहित नाही???त्यांना हाकलल्यास गुन्हेगारी कमी होईल्,गर्दी कमी होईल.मराठी माणसाची भविष्यात होणारी हानी वाचेल.भारतात सध्या शेतकर्‍यांच्या आत्महत्या हा मोठा प्रश्न आहे.महाराष्ट्र यात आघाडीवर आहे. विदर्भातील शेतकरीही मराठीच आहेत्.उध्दव ठाकरे या शेतकर्‍यांची एकजुट करवुन आणत आहेत्,त्यांच्यासाठी आंदोलन करत आहेत्.पण या आंदोलनांना पाठींबा देण्याऐवजी तुम्ही तुमच्या स्तंभातुन याची 'आंदोलनांचा खेळ' म्हणुन खिल्ली उडवली आहे!!!विदर्भातील शेतकरी मराठी नाहीत का???का फक्त मुंबई-ठाण्यात मराठी माणुस रहतो???जिथे खराखुरा 'मराठी माणसाच्या अस्तित्वाचा प्रश्न' आहे तिथे तुम्ही गप्प बसता.आज विदर्भात होणार्‍या आत्महत्यांकडे महाराष्ट्र सरकारने दुर्लक्ष केलेले आहे.उध्दव ठाकरे सोडले तर कोणीही मराठी नेता त्यात 'इंटरेस्ट' घेत नाही. उद्या या वागणुकीला कंटाळुन वेगळ्या विदर्भाच्या मागणीने जोर धरला व संयुक्त महाराष्ट्र फुटला तर्???मग तुम्ही परत मोठेमोठे अभ्यासपुर्ण लेख लिहाल्.पण सध्या उध्दव ठाकरेंना पाठींबा देणार नाही.

तुम्ही तुमच्या लेखात आंबेडकर्,अत्रे यांचे वारसदार दिवाळखोर निघाले म्हटले आहे.आंबेडकरांचे राहु द्या पण अत्र्यांचे वारसदार म्हणजे आजचे पत्रकार('मर्‍हाटा'काढल्यामुळे अत्र्यांनाही पत्रकार म्हणायला हरकत नसावी) तर नंबर एकचे दिवाळखोर आहेत.एव्हढेच नव्हे तर 'पत्रकार धर्म' विसरुन राजकीय कंपुबाजीत सगळे धन्यता मानत आहेत. राजु परुळेकरही त्यातलेच.'१९९० पासुन बाळासाहेबांनी महाराष्ट्र धर्माला नख लावायला सुरुवात केली' म्हणतात्.मग तुम्ही १८ वर्ष मुग गिळून का बसला होता???राज ठाकर्‍यांनी सेना सोडण्यापुर्वी(सोडल्यानंतरही) तुम्ही अनेकदा सेनाप्रमुखांवर स्तुतीसुमने उधळली होती.तेंव्हा कुठे गेला होता तुमचा 'महाराष्ट्र धर्म'??अत्र्यांनी त्यांच्या वृत्तपत्रातुन सतत मराठीचा मुद्दा धगधगत ठेवला.पण राजु परुळेकर मायावाती,मोदी व इतर अनेकविध विषयांवर आपली मते मांडत होते. अरे मराठीची इतकी वाईट परिस्थिती असताना तुम्हाला ती पुढे आणण्यासाठी आंदोलनाची गरजच का पडते??आंदोलन नव्हते तेंव्हा तुम्ही का लोकांना या विषयावर जागरुक केले नाही???तुमच्याकडे बंदुकिपेक्षाही घातक लेखणी नावाचे अस्त्र होते ते तुम्ही म्यानात ठेवुन 'चिल्लर' गोष्टींवर स्वतःचा स्तंभ भरवत होता.कधी राजकारण तर कधी काय. सगळ नॉन सेंस.मायमराठी भरडली जात असताना तुम्ही स्वतः त्याबद्दल लिहुन जनजागृती केली असती त्याला काही अर्थ होता.उगाच घडणार्‍या घटनांवर विश्लेशण करणे आणि याला त्याला दोष देणे फार सोपे असते.त्यात कंपुबाजी करुन 'पॉप्युलॅरीस्ट पत्रकारीता' करण तर अजुनच सोपं.सच्च्या पत्रकाराने शिवसेना मराठीचा मुद्दा सोडायला लागली असे वाटल्यावरच टिका केली असती. २ वर्षांपुर्वी राज ठाकर्‍यांनी सर्वसमावेशक धोरण घेतल त्याही वेळी 'भैय्यांना हटवायची गरज असताना सर्वसमावेशक धोरण कसल घेता??' म्हणुन राजवर हल्ला केला असता. पण तुम्ही यातल काहीच केल नाही.बहुतेक मनसेबरोबर जाउन चांगली संधी मिळेल असे तर तुमचे धोरण नाही ना??कारण पुण्यात समीरण वाळवेकरांनी घेतलेल्या मुलाखतीत राज ठाकरेंनी स्वतःच वृत्तपत्र सुरु करायचय असा मनोदय बोलुन दाखवला होता.मग त्याच्या संपादक पदी आपलीही वर्णी लागावी म्हणुन तुम्ही मनसेला पाठींबा करत नाही ना??मला भैय्यांबद्दल काडीचही प्रेम नाही.राज ठाकर्‍यांच्या भाषणाचा मीही फॅन आहे.त्यांच्या आंदोलनालाही माझा विरोध नाही.माझा विरोध स्वार्थी पत्रकारांना आहे.तुम्ही आधी शिवसेनेच्या कंपुत होता आता मनसेच्या कंपुत आहात. उद्या एखादा अजुन चांगला पर्याय आला तर तिकडेही जाल.अशी राजकीय कंपुगिरी करणार्‍या पत्रकारांनी सेनेला 'दिल्लीचे मनसबदार' तर शरद पवारांना 'वॉरलॉर्ड' म्हणन्याची गरज नाही.

आपला
चिन्मय कुलकर्णी

ता.क.-ज्या वेळी स्वातंत्र्याशी गरज होती आणि हिंदुविरुध्द 'डायरेक्ट ऍक्शन्स' होत होत्या त्या वेळी तमिळ लोकांनी द्रविडनाडुची मागणि केली होती.फाळणीवादी असलेल्या इतिहासातील तमिळ नेत्यांचीच करुणानिधी व समस्त कट्टर तमीळी पक्ष पिलावळ आहे.करुणानिधीने LTTE चा दोन नंबरचा म्होरक्या मारला गेल्यावर त्याच्यावर १ वर्षापुर्वी स्तुती करणारी कविता लिहुन ती प्रकाशित केली होती.महाराष्ट्राने या देशद्रोह्यांच्या पावलावर पाऊल का ठेवाव??